गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

प्लेटो : पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रणेता




जन्म  इ.स.पू. ४२८/४२७
मृत्यू   इ.स.पू. ३४८/३४७
अथेन्स, ग्रीस.
विषय : कला, साहित्य, न्याय,नीतिशास्त्र, राजकारण, शिक्षण.


प्लेटो हा प्राचीन ग्रीकतत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान,शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला. प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता.


प्लेटोचे तत्त्वज्ञान


सत्सामान्ये

प्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये सौंदर्यअसते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे द गुडला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो.

सत्सामान्यांची उपपत्ती

 ‘हे सुंदर आहे’, ‘हा घोडा आहेअशा विधेयनांमधील सुंदर, घोडा ह्यांसारख्या सामान्य पदांनी जे व्यक्त होते - म्हणजे सौंदर्य, घोडेपणा - ती विशिष्ट वस्तू नसते; तर ते एक सत्सामान्य, सद्‌रुप असते. ते इंद्रियग्राह्य नसते, विवेकग्राह्य असते. असे सत्सामान्य जेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये अवतरते, प्रविष्ट होते तेव्हा त्या वस्तूला ते स्वरुप प्राप्त होते. सत्सामान्ये ही स्थिर, अपरिवर्तनीय आणि चिरंतन असतात.
विशिष्ट, इंद्रियगोचर, परिवर्तनशील वस्तू शरीराशी निगडित असतात त्याप्रमाणे सामान्य, विवेकग्राह्य, स्थिर, चिरंतन सत्सामान्ये आत्म्याशी निगडित असतात. शरीर आणि आत्मा ह्यांच्यामधील द्वैत हे याचे प्रतिबिंबच आहे. विवेकशक्तीने युक्त असलेला आत्मा ह्या अपरिवर्तनीय, नित्य व म्हणून दिव्य स्वरुपाच्या असलेल्या सत्सामान्यांचे बौद्धिक दर्शन घेत असतो. म्हणजे आत्म्याचे स्वरुप सत्सामान्यांसारखे असते, म्हणजे दिव्य असते व म्हणून आत्मा अमर असतो. ज्ञान म्हणजे स्मरणहा जो सॉक्रेटिसचा सिद्धांत मेनोमध्ये मांडलेला आहे त्याचाही उलगडा सत्सामान्यांची उपपत्ती आणि आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत यांच्या साहाय्याने करता येतो.
इंद्रियसंवेद्य वस्तूंचे स्पष्टीकरण करताना सत्सामान्यांच्या स्वतंत्र जगाचा सिद्धांत प्लेटोने मांडला. हे इंद्रियसंवेद्य जग वरिष्ठ जगाची हलक्या प्रतीची प्रतिकृती आहे. त्या दोन्ही जगांमध्ये असंख्य गोष्टी भरलेल्या आहेत. व्यावहारिक दिक्कालाच्या जगात जशा असंख्य गोष्टी राहतात तशाच अनेकविध अक्षय अशा कल्पना वा सत्सामान्ये त्यांच्याजगात राहतात असे मानल्याने वास्तवतेचे स्वरूप अधिक क्लिष्ट झाले हे मान्य करावे लागते.
एकूण विश्वाचे स्वरूप सांगताना प्लेटोला ईश्वर, सत्सामान्ये व इंद्रियसंवेदनांना उपलब्ध जग अशा तीन गोष्टींची आवश्यकता भासते. विशिष्ट काळात तयार झालेल्या जगामागे ईश्वर असून तो सत्सामान्यांच्या आधारे हे जग तयार करतो अशी त्याची कल्पना आहे. बुद्धिनिष्ठतेला, सत्सामान्यांना प्राधान्य देताना जगाच्या उत्त्पत्तीत ईश्वराला निर्माता म्हणून असलेले स्थान प्लेटो कायम ठेवतो. खरा चमत्कारिक प्रसंग निर्माण होतो तो म्हणजे कल्पनांचे खरेखुरे जग आणि हे इंद्रियांना जाणवणारे कमअस्सल जग यांचा संबंध निश्चित करताना होणारी त्याची तारांबळ. जर सत्सामान्ये येथील जगाच्या वस्तूंमध्ये सहभाग (पार्टिसिपेशन) घेतात तर इतक्या अलिप्तपणाने स्वतंत्र वास्तव्य ती कशी काय करतात ?

आयडियांच्या सिद्धांतावरील आक्षेप

मनुष्य व मनुष्याची आयडिया ह्यांत जो साधारण भाग आहे, त्यासाठी मनुष्याची आयडिया-२ असली पाहिजे, व मग पहिल्या आयडियात व दुसर्याचत असणार्या समान भागासाठी आयडिया-३ असली पाहिजे. अशा रीतीने अनवस्था प्रसंग येतो. विशिष्ट वस्तू आयडियांत कशा सहभागी होतात? आयडिया सबंध वस्तूंत येत असेल तर जितक्या वस्तू तितक्या आयडिया होतात, भागशः येत असेल तर ती विभाजनीय आहे; म्हणून आयडिया एक व अविभाज्य असू शकत नाही. सॉक्रेटिस उपाय सुचवतो की, यासाठी आयडिया मनातच आहेत असे समजावे. पार्मेनिडीझ म्हणतो : मनातील कल्पना कशाच्या तरी असतात. आयडिया केवळ विचारच असेल तर ती वस्तूंत कशी असेल? समजा, आयडिया असल्याच तर त्या सीमित मनुष्यांना कशा करणार? शुद्ध आयडिया शुद्ध आत्म्यांत म्हणजे ईश्वरांत राहणार. तसेच ईश्वराला व्यावहारिक वस्तूंचे ज्ञान होणार नाही म्हणून या सिद्धांतातून आपल्याला आयडिया अज्ञेय व ईश्वराला व्यवहार अज्ञेय असा दुहेरी अज्ञेयवाद होतो. आयडियांचा एकमेकींशी संबंध काय आहे? त्यांचे संघटन व विघटन करता येते का? त्यांचे वर्ग होतात काय?

प्लेटोची गुहा

प्लेटोच्या तत्त्वज्ञानाची भाषा मुख्यत: साहित्यिक राहिलेली आहे. त्याच्या शास्त्रीय व तात्त्विक सिद्धान्ताचे आविष्करण करताना तो रुपके वापरतो. रिपब्लिकमध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रुपक वापरलेले आहे. त्या अंधाऱ्या गुहेत दोरखंडाने बांधलेले काही कैदी तुरुंगाच्या भिंतीकडे बघू शकतात अशी कल्पना केली आहे. ते एकमेकांकडे वळूनही बघू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे उंचावर एकमेव झरोका आहे. त्यातून भिंतीवर उजेड पडतो. उजेडाकडे पाठमोर्या असलेल्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींची हालचाल भिंतीवरील पडछायांच्या स्वरुपात फक्त दिसते. बाहेरील व्यक्ती डोक्यावर पुतळे घेऊन इकडेतिकडे हालचाल करीत आहेत. गुहेबाहेरील त्या व्यक्ती वस्तू इकडून तिकडे हलवतात त्याची छायाचित्रेकैद्यांना बघता येतात. कैद्यांच्या जगाच्या वास्तवाच्या कल्पनेत असते ते छायाकृतींचे जग. त्यापलीकडे अन्य काही नाही. गुहेतील एखाद्या कैद्याला मुक्त होण्याची संधी मिळून जेव्हा तो गुहेबाहेरील स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले जग बघू शकतो तेव्हा आधीच्या अनुभवात उतरलेले जगाचे स्वरुप वास्तविक नव्हते हे त्याच्या लक्षात येते. शृंखलांमधून, मर्यादांमधून बाहेर पडल्यावर छायांचे जग संपते. सूर्यप्रकाशाने माखलेल्या या जगापलीकडे अधिक आणि अंतिम अर्थी सत्य तो आणखी प्रयत्नांनी पाहू शकतो. हे जमते तेव्हा प्रकाशातील जगापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत असलेल्या देदीप्यमान अशा सूर्याच्या वास्तवाची त्याला जाण येते. ही ज्ञानाची सर्वात वरची पायरी आहे. हा सूर्य जगातील सर्वात शिवाचे (द गुड) प्रातिनिधिक रूप आहे.
या गुहेच्या रुपकातून प्लेटोने विवेकी मनाचा विकास अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या पायरीपासून विवेकापर्यंत, अंधकारापासून प्रकाशाच्या वाटेकडे कसा होतो हे दाखवले. जाणिवेला विशेष प्रयत्नांनी प्रकाशाकडून प्रकाशाच्या उगमापर्यंत जाता येते. सूर्याच्या दर्शनानंतर अंधकारात बंदी असलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारी काही माणसे असतात पण गुहावासियांना प्रकाश पाहिलेल्यांचा भरवसा वाटतो असे नाही. एका अर्थाने गुहेचे रुपक हे सॉक्रेटिसच्या आयुष्याला चपखलपणे लागू होते हा योगायोग नक्कीच नसावा.
प्लेटोच्या संवादांपैकी फीडो, सिंपोझियम आणि रिपब्लिक ह्या संवादांचे एक समान वैशिष्ट्य आहे. प्लेटोचे मानवी जीवनाविषयीचे जे आध्यात्मिक व नैतिक दर्शन आहे, त्याला आधारभूत असलेली जी सत्सामान्यांची किंवा सद्‌रुपांची उपपत्ती आहे तिची मांडणी आणि विकास ह्या संवादांत करण्यात आला आहे. उदा. फीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याच्या दिव्यत्वाचे आणि त्याच्यापासून निष्पन्न होणाऱ्या अमरत्वाचे समर्थन करणे हे आहे. हे समर्थन आत्म्याची सत्सामान्यांशी सांगड घालून करण्यात आले आहे.

ज्ञान म्हणजे स्मरण

भूमितीमध्ये आपण स्वतःच अनुमान करून पूर्वी आपल्याला अवगत नसलेले ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. बाह्य वस्तूंच्या निरीक्षणाने हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले नसते किंवा दुसऱ्या कुणाकडे असलेले ज्ञान त्याने आपल्याला दिल्यामुळे ते आपल्याला प्राप्त झालेले नसते. तेव्हा हे ज्ञान आपल्यामध्येच असते, ते तिरोभूत असते, ते बाहेर येते, आविर्भूत होते. आता दोन प्रश्न उपस्थित होतात - पहिला, हे ज्ञान आपल्यामध्ये प्रथम प्रविष्ट होते कसे? दुसरा, आपल्यामध्ये सुप्त असलेल्या ज्ञानाचे स्मरणहोते कसे? आता आत्मा शरीराहून भिन्न आहे आणि तो अविनाशी असल्यामुळे तो अनेकदा जन्म घेतो. शुद्ध अवस्थेत असलेल्या आत्म्याला सत्सामान्यांचे साक्षात दर्शन होत असते. हे ज्ञान घेऊन तो जन्माला येतो. पण शरीरात असताना हे ज्ञान त्याच्यात सुप्त असते. आता इंद्रियगोचर वस्तूंचे स्वरुप त्यांच्यात उपस्थित असलेल्या सत्सामान्यांचे बनलेले असते. ही सत्सामान्ये आत्म्याने आपल्या पूर्वीच्या अवस्थेत पाहिलेलीअसतात. त्यांच्यासारख्या असलेल्या इंद्रियगोचर वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपल्याला होते, तेव्हा ह्या सत्सामान्यांचे स्मरणआपल्याला होते. इंद्रियानुभवापासून खरेखुरे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, विवेकशक्तीने सत्सामान्ये आणि त्यांच्यामधील संबंध यांचे केलेले ग्रहण हे खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे स्वरुप असते आणि इंद्रियांपासून मिळणारे ज्ञान हे खऱ्याखुऱ्या विवेकजन्य ज्ञानाचे स्मारक असते, असा प्लेटोचा सिद्धांत आहे. (मेनो ह्या संवादात हा सिद्धांत स्पष्टपणे मांडलेला आहे.)
पार्मेनिडीझ मध्ये सत्सामान्यांच्या उपपत्तीचे चिकित्सक परीक्षण करण्यात आले आहे. तरुण सॉक्रेटिस आणि पार्मेनिडीझ यांच्यामधील हा संवाद आहे. एक आणि अनेक यांच्यामधील संबंध काय आहे?’ हा जो कूटप्रश्न आहे त्याचा समाधानकारक उलगडा सत्सामान्यांच्या उपपत्तीच्या साहाय्याने होऊ शकतो अशी भूमिका सॉक्रेटिस मांडतो. एलिअ‍ॅटिक पंथाचा संस्थापन असलेल्या पार्मेनिडीझचा सिद्धांत असा होता, की केवळ एक सत्य असते आणि अनेकांचे अस्तित्व केवळ आभासात्मक असते. ह्यावर सॉक्रेटिस असा विचार मांडतो, की सत्सामान्य हे एक असते (उदा. सौंदर्य); पण त्या एका सत्सामान्यात सहभागी होणार्यात व म्हणून एकाच स्वरुपाच्या असलेल्या अनेक वस्तू (उदा. सर्व सुंदर वस्तू) असतात, असे मानले की हा प्रश्न सुटतो. सत्सामान्यांचे जग वेगळे आणि विशिष्ट वस्तूंचे जग वेगळे असल्यामुळे ह्या मानण्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.
ज्ञानह्याची नेमकी व्याख्या कशी करता येईल, हा प्रश्न थीएटेटस ह्या संवादाचा प्रमुख विषय आहे. परीक्षणासाठी प्रथम घेतलेली व्याख्या म्हणजे प्रोटॅगोरसने केलेली ज्ञान म्हणजे वेदन’ (सेन्सेशन) ही व्याख्या. प्रत्येकाला कोणत्याही क्षणी जे जाणवत असते, ते त्या जाणिवेइतकेच आणि तिचा विषय म्हणून अस्तित्वात असते आणि म्हणून हे वेदन सत्य असते. व्यक्तीच्या क्षणिक जाणिवेपलीकडचा असा सत्याचा वस्तुनिष्ठ मानदंड नसतो. ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत असते असे सांगताना ज्ञान म्हणजे केवळ वेदन नव्हे, तर वेदनांविषयी आत्म्याने केलेले निर्णय अशी भूमिका सॉक्रेटिस मांडतो. इंद्रियांव्यतिरिक्त आत्म्याला जाणवणाऱ्या काही गोष्टी असतात (साम्य, संख्या, अस्तित्व) असे सॉक्रेटिस म्हणतो.
ज्ञान म्हणजे सत्य निर्णय अशी व्याख्या करण्यात असत्य निर्णय किंवा भ्रांती म्हणजे काय हे माहीत असण्याचा अडथळा येतो. थीएटेटसमध्ये ज्ञानाची व्याख्या करण्यात अपयश आलेले आहे. फक्त नित्य पदार्थांचेच खरेखुरे ज्ञानआपल्याला होऊ शकते; इंद्रियगोचर वस्तूंविषयीच काय ते मतबनवता येते, हा टायमिअस आणि क्रिटिअस मधील निष्कर्ष आहे.
इंद्रियगोचर व परिवर्तनशील असे हे जे विश्व आहे त्याच्या अस्तित्वाला कालामध्ये प्रारंभ होतो; ते नित्य नाही. ते ईश्वराने रचलेले आहे. ह्या रचनेसाठी ईश्वर परिपूर्ण सत्सामान्ये आदर्श म्हणून स्वीकारतो आणि त्यांच्या प्रतिकृती म्हणून इंद्रियगोचर वस्तू स्वीकारतो. ईश्वर बुद्धी आणि सदिच्छा ह्या गुणांनी युक्त असा आहे; म्हणून तो परिपूर्ण सत्सामान्यांना आदर्श नमुने म्हणून स्वीकारतो आणि सुव्यवस्थित असे विश्व बनवितो. आदर्श सत्सामान्यांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी द्रव्य आवश्यक आहे. हे द्रव्य म्हणजे अवकाश-सत्सामान्य. हे आकारिक आणि बुद्धिग्राह्य असते. विशिष्ट वस्तू ही द्रव्याला (अवकाशाला) सत्सामान्यांनी आकारित केल्याने घडलेली असते आणि द्रव्याला आकार देण्याचे हे कार्य ईश्वराने, बुद्धियुक्त अशा ईश्वराने केलेले असते. तेव्हा विश्वाचे स्वरुप समजण्यासाठी ईश्वर, सत्सामान्ये आणि अवकाशरुप द्रव्य ही तीन तत्त्वे समजून घेतली पाहिजेत.

आत्म्याचे अमरत्व

फीडो ह्या संवादाचे उद्दिष्ट आत्म्याचे अमरत्व सिद्ध करणे हा आहे. आकारांच्या सिद्धांताचा वापर करून हे दाखविता येते. सॉक्रेटिसचा आत्मा म्हणजे सॉक्रेटिसच : सॉक्रेटिसचा आत्मा टिकणे याचा अर्थ विशुद्ध अवस्थेतील सॉक्रेटिसच टिकणे असा होतो. सॉक्रेटिसने आयुष्यभर स्वतःला (आत्म्याला) शरीरावरील अवलंबित्वापासून सोडविण्याचा प्रयत्न केला. शरीर हे नेहमीच आत्म्याच्या गतिविधींवर मर्यादा आणीत असते. शरीराच्या भुका आणि इच्छा आत्म्याला ज्ञान आणि चांगुलपणाची कास धरू देत नाहीत. आत्मा मृत्यूनंतरही टिकून राहतो असे समजण्यामागे चार युक्तीवाद आहेत.
1.            निसर्गातील घटना या चक्रीय स्वरुपाच्या आहेत. आत्म्याने अनेक जन्म घेतलेले आहेत आणि निसर्गातील चक्रियता आत्म्यालाही लागू होते.
2.            ज्याला मनुष्य ज्ञानम्हणतो ते मुळात स्मरणअसल्याने आत्म्याचे जीवन शरीरावर अवलंबून नाही हे सिद्ध होते; किमानपक्षी तसा अंदाज बांधता येतो.
3.            आत्मा चिरंतन, अपरिवर्तनीय आणि निरवयवी (सिंपल) असलेल्या आकारांचे मनन (ध्यान) करतो; आत्मा आकारांप्रमाणेच आहे; म्हणून तो अविनाशी आहे.
4.            हा युक्तीवाद तपशीलवार आणि लक्षवेधक आहे. असणे (बिइंग) आणि बदलामागील कारणे शोधताना सॉक्रेटिस आकारांचा सिद्धांत वापरतो. उदा., एखादी गोष्ट तापते, ती उष्णतेमध्ये सहभागी झाल्याने तापते. आणखी पुढे जाऊन, अग्नीमध्ये सहभागी झाल्याने ती तापते असे म्हणता येईल. (अग्नीसोबतच उष्णता येते.) आता अग्नी जर उष्णता आणीत असेल, तर तो शीतलतेचा स्वीकार करणार नाही. कारण शीतलता ही अग्नीची विरोधावस्था आहे. हाच युक्तीवाद आत्म्याला लावल्यास मनुष्य जीवनामध्ये सहभागी होऊन जिवंत राहतो, आणि जीवन हे आत्म्यांसोबतच येते. आत्मा जीवन आणीत असल्याने तो मृत्यू कधीही स्वीकारणार नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा