शनिवार, ७ एप्रिल, २०१८

मिसिंग : स्त्रियांनी मांडलेला स्त्रियांचा संघर्ष






मातृत्व ही जगातील सर्वात श्रेष्ठ भावना आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आई कोणत्याही थराला जाते. कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर मात करण्याची शक्ती स्त्रीकडे येते ती या मातृत्त्वामुळे. मात्र या आईपणासोबतच तिचं बाईपण एका थरारपटातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे ली ओन ही या दक्षिण कोरियन दिग्दर्शिकेने. एका स्त्रीने स्त्रियांना केंद्रीभूत करून निर्माण केलेला हा चित्रपट एकीकडे अपहरण झालेल्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेणाऱ्या आईचा संघर्ष तर दाखवतोच मात्र त्यासोबतच पूर्व आशियातील स्त्रियांच्या आयुष्याचे विदारक वास्तवही मांडतो. त्यामुळेच या थरारपटाने वेगळी उंची गाठलेली दिसून येते.
चित्रपटाची सुरुवात आपल्या वरिष्ठांची बोलणी खाणाऱ्या जी सूनच्या प्रवेशाने होते. पतीपासून घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहणारी, एका वृत्तवाहिनीत काम करणारी आणि आपल्या दीड वर्षाच्या मुलीच्या – दा ऊनच्या कस्टडीसाठी कोर्टात खेटा घालणारी जी सून आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाही. तिची देखभाल करण्यासाठी घरात बाई ठेवते. पदरमोड करून घरखर्च आणि वकिलाची फी भागवते. मात्र या संघर्षातलं तिचं एकाकीपण आपल्याला अस्वस्थ करतं. घटस्फोट झाल्यानंतरही दा ऊनला मिळविण्याची इच्छा असणाऱ्या आपल्या सासूकडून आणि पतीकडून मानसिक त्रासाला बळी पडणाऱ्या जी सूनला कामाच्या ठिकाणीही वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळते. फोनवरच्या एका संवादात तिचा बॉस म्हणतो, जगात कुणीच आपल्या ऑफिसात मुलं असणाऱ्या बायकांना कामावर ठेवू नये. यांना आम्ही कामाचा पगार द्यायचा आणि कामाचे तास वाचवून यांनी आपली मुलं सांभाळायची. इतकेच नव्हे तर घरी परतत असताना बिल्डींगचा वॉचमनसुद्धा मुलांना वेळ न देऊ शकणाऱ्या स्त्रिया आई होण्याचा निर्णयच का घेतात असा टोमणा मारतो. हे संवाद पुरुषांचा काम करणाऱ्या स्त्रियांच्याबाबत असणारा दृष्टीकोन समोर आणतात. यावेळी जी सूनच्या चेहऱ्यावरची वेदना आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. रात्री उशीरा घरी परतलेल्या आपल्या आईकडे रांगत येणारी दा ऊन, तिच्या डोळ्यातील भाव फारच बोलके आहेत. आपल्या लाडक्या लेकीला उचलून घ्यावं, दिवसभराचं प्रेम द्यावं अशी मनात इच्छा असूनसुद्धा कामाच्या परिहार्यतेमुळे जी सूनला हे शक्य होत नाही. पतीपासून स्वतंत्र राहणाऱ्या स्त्रीचं आयुष्य किती खडतर असतं याचं हे चित्र अवघ्या १० मिनिटात आपल्या नजरेसमोरून सरकतं आणि मग आपण चित्रपटाच्या मुख्य विषयाकडे वळतो.
जी सूनने ठेवलेल्या चिनी बाईच्या बेजबाबदारपणामुळे दा ऊनला दुखापत होते. जी सून तिला कामावरून काढून टाकते. मग नव्या बाईचा शोध सुरु होतो. जी सूनची निकड लक्षात घेऊन एक ओळखीची बाई आपल्या एका तथाकथित भाचीला घेऊन येते. जी सूनला कोरियन भाषा आणि लिपी न येणाऱ्या आणि चेहऱ्यावरूनच चिनी वाटणाऱ्या या नव्या मुलीचा - हान मीचा संशय येतो. ती याबाबत विचारणा करते. तिची ओळखपत्रे मागते. मात्र तिने सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने आणि तिच्याजवळ गेल्यानंतर दा ऊन रडायची थांबल्याने जी सून तिला कामावर ठेवते. सारं काही व्यवस्थित चाललं असतं. मात्र अचानक जी सूनला कौटुंबिक न्यायालयातून फोन येतो. दा ऊनच्या कस्टडीसंदर्भात कोर्टात तारीख असते. मात्र घरी आलेली नोटीस जी सूनला माहितच नसते. हान मीला कोरियन लिपी माहित नसल्याचा फटका जी सूनला बसतो. न्यायालयात पोहोचायला तिला उशीर होतो. त्यातून काम करणारी स्त्री मुलांना वेळ देऊ शकत नाही, त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकत नाही, शिवाय घटस्फोटीत स्त्री मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम असू शकत नाही असा अभिप्राय नोंदवत न्यायालय दा ऊनची कस्टडी तिच्या वडिलांना आणि आजीला देते. समाजाचा स्त्रीकडे, तिच्या कर्तृत्वाकडे पाहण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन पाहून आपली बाजू मांडण्याचा नायिकेचा केविलवाणा प्रयत्न आपल्याला व्यथित करतो.
जड अंतःकरणाने जी सून घरी परतते. मात्र हान मी आणि दा ऊन दोघीही घरात नसतात. यानंतर दा ऊनचा शोध सुरु होतो. आजूबाजूचा सारा परिसर शोधून झाल्यावर कदाचित आपली सासूच आपल्या मुलीला घेऊन गेली नसेल ना या विचाराने ती आपल्या पतीला फोन करते, मात्र तिचा पती मुलीची कस्टडी द्यायची नाही म्हणून तूच केलेला हा बनाव आहे, मुलीला आमच्या ताब्यात दे अन्यथा तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ अशी धमकी देतो. अखेर आपणच आपल्या मुलीचा शोध घ्यायचा असा निश्चय जी सून करते. जी स्त्री हान मीला घेऊन आली होती तिच्याकडे पहिली विचारणा होते. मात्र काम मिळवून देण्यासाठी हान मीने आपल्याला पैसे दिले होते. याव्यतिरिक्त आपल्याला काही माहित नाही असे सांगून ती बाई हात वर करते. अखेर हान मीला उधार पैसे देणाऱ्या एका माणसाच्या साथीने सुरु झालेला हा शोध जी सूनला चक्क एका कुंटणखान्यात घेऊन जातो. आपल्या घरात कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे राहणारी हान मी कामाचे तास संपल्यानंतर एका वेश्येचं जीवन जगत असल्याचे कळल्यावर जी सूनला धक्का बसतो. तिचं सामान तपासल्यावर तिचं नाव हान मी नसून किम योन आहे, तिने दिलेली सगळी कागदपत्रे खोटी आहेत, आणि ती चीनमधून अवैधरीत्या कोरियात आल्याचा खुलासा होतो. आता या किम योनला कसं आणि कुठे शोधायचं हा प्रश्न उभा राहतो. यावेळी कुंटणखाना चालवणारी बाई जी सूनला म्हणते, तू एकटी बाई आहेस आणि तुला मुलगी आहे, यापेक्षा वाईट काय असू शकतं? या प्रश्नाने काळजाला घरं पडलेली जी सून तिथून बाहेर पडते. एका अनामिक नंबरवरून आलेल्या फोनवरून तिच्याकडे ३३० लाख वोन (सुमारे २० लाख रुपये) खंडणी मागण्यात येते. आपल्या खात्यात असणारे ५४ लाख वोन (सुमारे सव्वातीन लाख रुपये) ती तत्काळ दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर करते.
उरलेले पैसे जमवण्यासाठी तिची खटपट सुरु असतानाचा पोलीस तिला अटक करतात. तिच्या सासूने तिच्याविरोधात दा उनला जाणीवपूर्वक लपवल्याची तक्रार नोंदवलेली असते. पोलीस स्टेशनमध्येही खरी परिस्थिती जाणून न घेता जी सूनवर आरोप होतात, सासूकडून मारहाण होते. ती किती वाईट पत्नी, वाईट आई आणि वाईट सून आहे हे तिची सासू प्रत्येक पोलिसाला सांगत असते. या गोंधळाचा फायदा घेत जी सून तिथून निसटते. थेट चीन गाठते आणि इथून पूर्व आशियातील स्त्रियांचे एक वेगळे विश्व आपल्या समोर येते.
किम योनच्या घराचा शोध लागल्यावर तिच्या शेजाऱ्यांकडून तिचं आणि एकंदरच तिथल्या स्त्रियांचं जीवन उलगडत जातं. मूल नाही म्हणून घरच्या माणसांकडून होणारा शारीरिक, मानसिक छळ, पतीची मारहाण, केस कापून केलं जाणारं स्त्रियांचं विद्रुपीकरण, परभाषिक स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, त्यांना नाकारला जाणारा शिक्षणाचा हक्क आदी अनेक बाबी पहायला मिळतात. मात्र हे विदारक वास्तव मूळ कथानकात इतकं बेमालूम मिसळलं आहे की कुठेही हे प्रसंग प्रचारकी होताना दिसत नाहीत. पुढे किम योनने मुलीला जन्म देणं, तिच्या मुलीला किडनीचा आजार असणं आणि त्यावर उपचार करण्यास कुटुंबाने नकार देणं हा सगळा प्रकार जी सूनला कळतो. मुलीच्या आजारावर उपचार कशाला? मुलगा असता तर गोष्ट वेगळी होती. हे किम योनच्या सासूचं वाक्य परिस्थितीची विदारकता वाढवतं. किम योन अद्याप कोरीयातच असल्याची खात्री पटल्यावर जी सून मायदेशी परतते.
इथे कोरियात जी सून आणि दा ऊनचा शोध सुरु असतो. जी सूनने ज्याला पैसे पाठवले, त्या पार्क ह्यून इकला पोलीस ताब्यात घेतात आणि एक नवाच खुलासा होतो. दक्षिण कोरिया हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करणारा आशियातला सगळ्यात मोठा देश आहे. इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील म्हणून चीन, उत्तर कोरिया, जोएसन (उत्तर कोरिया, चीन आणि रशिया या देशांच्या सीमा जिथे एकमेकांना मिळतात असा स्वयंशासित भूभाग) येथून अनेक नागरिक अवैधरीत्या दाखल होतात. मात्र त्याचं पुढे काय होतं याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. आपल्या मुलीवर उपचार व्हावेत म्हणून किम योन घरातून पळून अवैधरीत्या दक्षिण कोरियात येते. आपल्या मुलीला – जे इनला हॉस्पिटलमध्ये दाखल करते. कोरियन भाषा आणि लिपी माहित नसल्याने पैसे कमावण्यासाठी अखेर कुंटणखान्याचा आश्रय घेते. मुलीच्या उपचाराचा खर्च त्यातून भागणार नसतो, म्हणून आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे उधार घेते. पार्क ह्यून इक हाही त्यांपैकीच एक असतो. निर्वासितांना फसवून आपला खिसा गरम करणारा ह्यून इन किम योनला झटपट पैसे कमावण्याचा मार्ग दाखवतो. ह्यून इनच्या सांगण्यावरून किम योन स्वतःची किडनी विकायला तयार होते. मात्र ह्यून इन तिची किडनी तर घेतोच मात्र तिला पैसे न देताच परागंदा होतो. हॉस्पिटलचं बिल न भरल्याने अत्यवस्थ जे इनला डिस्चार्ज दिला जातो. त्यातच किम योनच्या मुलीचा- जे इनचा मृत्यू होतो.
आतापर्यंत किम योन समोर आली की मी तिचा जीव घेईन असं म्हणणाऱ्या जी सूनच्या मनात आता तिच्याबद्दल कणव जाणवायला लागते. पार्क ह्यून इक तिला जे इन दाखल असलेल्या हॉस्पिटलचा पत्ता देतो. इथे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कारण पैशाअभावी जे इनवर उपचार करण्यास नकार देणारा आणि पर्यायाने तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा डॉक्टर अन्य कुणी नाही तर दा ऊनचा पिता आणि जी सूनचा पती असतो. आता दा ऊनच्या अपहरणामागचं कारण स्पष्ट होऊ लागतं. जी सूनच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं. दा ऊनला पहिली दुखापत चिनी बाईच्या बेजबाबदारपणामुळे झालेली नसते तर किम योनने ती जाणीवपूर्वक घडवून आणल्याचं समोर येतं. अखेर पुढील सुगावा शोधण्यासाठी पोलीस जी सूनच्या घरी पोहोचतात. दरम्यान जी सूनच्या घरातच डायनिंग टेबलमध्ये लपवलेल्या एका कुलिंग बॉक्समध्ये एका दीड वर्षीय मुलीचा मृतदेह सापडतो. हा मृतदेह कुणाचा असतो? जी सूनचं पुढे काय होतं? किम योन सापडते का? हे प्रत्यक्षच पाहायला हवं.
अनेक घटनाप्रसंगांची गर्दी असणारा हा चित्रपट केवळ दीड तासाचा आहे. त्यामुळे चित्रपटाचं कथानक वेगाने पुढे सरकतं. दिग्दर्शिकेचा प्रेक्षकांवर आणि त्यांच्या आस्वादक्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ती कोणत्याची घटनांची तपशिलात वर्णनं आणि स्पष्टीकरणं देण्याचा हव्यास धरत नाही. मात्र तिला जे सांगायचं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत निश्चितच पोहोचतं. हा चित्रपट नायिकाप्रधान आहे, आणि लौकिकार्थाने येथे नायिकाच प्रधान आहे. अन्य पुरुष पात्र ही ठराविक प्रसंगी अवतरतात. त्यांना सोपवलेल्या भूमिका मात्र योग्य रीतीने वठवतात. हा चित्रपट समाजातून स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्यासोबत होणारं दुर्वर्तन, शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्यावर ओढवणाऱ्या आपत्ती, पुरुषप्रधान व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्या यांवर भाष्य तर करतोच, मात्र हा चित्रपट आशियाई देशातील दारिद्य्र, रोजगाराचे प्रश्न, अवैधरीत्या अन्य देशांमध्ये होणारी घुसखोरी, भांडवलशाही धोरणांमुळे झालेल्या माणुसकीचा ऱ्हास आदी बाबीही अधोरेखित करतो.
घट्ट बांधलेलं कथानक, अचूक दिग्दर्शन, उत्कृष्ठ पार्श्वसंगीत आणि कायम जाणवणारा ताण या चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील. मात्र कथानकाचा प्रचंड वेग पाहता काही प्रसंग समजून घेण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पाहावे लागतात. 'मास्टर' या क्राईम थ्रिलरमध्ये ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या उह्म जी वोनने निभावलेली ली जी सून, सामाजिक मानसिकतेशी असणारा तिचा संघर्ष, तिचा कणखरपणा, तिचं धाडस, स्वतंत्र निर्णयक्षमता आणि अवघड परिस्थितीत तिने दाखवलेला संयम आपल्या लक्षात राहतो. 'सिंगल रायडर' या चित्रपटातून स्त्रीमनाचे विविध कंगोरे समर्थपणे मांडणाऱ्या गोंग ह्यो जीन हिने निभावलेली हान मी / किम योन आपल्याही मनात एकाच वेळी राग आणि करुणा निर्माण करते. खरं सांगायचं झालं तर भारत काय किंवा पूर्व आशिया काय, चित्रपटसृष्टीवर कायम पुरुषांचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र होंग उन मी या लेखिकेने लिहिलेला, ली ओन हीने दिग्दर्शित केलेला, उह्म जी वोन आणि गोंग ह्यो जीन या अभिनेत्रींनी भूमिका साकारलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने वेगळा आहे. या स्त्रियाच या चित्रपटाच्या केंद्रबिंदू आहेत. स्त्रियांनी स्त्रियांना समोर ठेवून तयार केलेला हा चित्रपट दक्षिण कोरियात तर नावाजला गेलाच मात्र यातील वास्तवतावादी चित्रण आणि थरार याची भुरळ अन्य आशियाई देशांनाही पडली आहे. म्हणूनच हा चित्रपट जपान, सिंगापूर, ब्रुनैल, कंबोडिया, लाओस, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि श्रीलंका आदी अन्य १३ देशातही प्रदर्शित झाला. या देशांमध्येही प्रेक्षकांनी या चित्रपटाला उचलून धरले. हा थरार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाची भाषा कोरियन असली तरी इंग्रजी सबटायटलच्या आधारे तुम्ही याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. 



शनिवार, ३१ मार्च, २०१८

माझा वाढदिवस

मला अनेकदा अनेकांनी विचारलं असेल, तुझा वाढदिवस कधी? मात्र आजही मी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते. यामागचं कारण काय हे मला आजही सांगता येणार नाही.
बरीच वर्ष उलटून गेली आहेत आत्ता. मात्र शाळा आणि तिथले दिवस मात्र विसरता येत नाहीत. प्राथमिक शाळेत असताना ज्यांचा वाढदिवस असे त्या मुलांना बाई समोर बोलावत. अन्य मुलं त्यांना शुभेच्छा देणारा श्लोक म्हणत. त्यानंतर वाढदिवस असणारी मुले वर्गातल्या सगळ्या मुलांना भेटवस्तू देत असत. त्या भेटवस्तूंची उत्सुकता इतकी असे की बाईंच्या लक्षात नसलं तरी वर्गातली अन्य मुले त्यांना आठवण करून देत. कुणी पेन्सिल, कुणी कंपास, तर कुणी अन्य नव्या नव्या वस्तू देई. कुणीतरी आपल्याला काही दिलं तर आपणही द्यायला हवं ही समज तेव्हाही होतीच. पण ऐपत नव्हती. मग वाटायचं, आपला वाढदिवस कधीच येऊ नये. तो कुणाच्या लक्षात असू नये. किमान आपल्या वाढदिवसाला सार्वजनिक सुट्टीच असावी. माझा वाढदिवस मार्चअखेरीस असल्याने हे घडायचंही अनेकदा. पुढे माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात आल्यावर मैत्रिणींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहत आले. कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं, मैत्रिणींना खाऊ घालायचं, महागडी गिफ्ट द्यायची म्हणजे वाढदिवस हे समीकरण कळू लागलं आणि मग वाढदिवस हा शब्द ऐकला की मी काढता पाय घेऊ लागले. आणि तसंही कुणी माझा वाढदिवस लक्षातही ठेवला नाही. तेव्हापासून आजपर्यंत वाढदिवस या शब्दाची गूढ भीती कायम आहे.
गतवर्षी मी ठरवलं होतं, आपल्या वाढदिवसाला सुट्टीच घ्यायची. मात्र नेमका त्याचदिवशी टीवायबीएच्या मुलांनी त्यांचा निरोप समारंभ ठेवला. मला कुणी अचानक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर? या विचाराने हादरलेच होते मी. मनात प्रचंड चलबिचल होती. मुलं वर्गाची सजावट करत होती. मी तयारी कुठवर आलीये हे पहायला गेले तर त्यांनी मला हाताला धरून बाहेरच काढलं आणि दार लावून घेतलं. नंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा सुखद धक्काच बसला. फळ्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा, फुगे, केक आणि मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद. मनात खोलवर जाणवलं, हा माझा खरा वाढदिवस. केक कापल्यावर मुलांनी फुगा फोडला आणि त्यातून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला. मी प्रत्येक चिठ्ठी वाचली. मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपण खूपच स्पेशल आहोत हे तेव्हा जाणवलं. आपलं जगात येणं सार्थकी लागलंय असं वाटलं.
यावर्षी अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक सुट्टी होती. मात्र तरीही रात्री १२ वाजता मुलांनी पाठवलेले शुभेच्छासंदेश यायला  सुरुवात झाली आणि हा ओघ संध्याकाळपर्यंत सुरु होता. प्रत्येकाचे संदेश लगेच वाचणं शक्य नव्हतं. मात्र आपल्या शुभेच्छा बाईंनी वाचल्या नाहीत या विचाराने अस्वस्थ झालेल्या काहींनी मग फोनवरून शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरा जेव्हा मोबाईल हातात घेतला तेव्हा पाहिलं तर सोशल मिडीयावर तर शुभेच्छा होत्याच. मात्र मुलांनी त्याच्या वैयक्तिक प्रोफाईल फोटो, स्टेटस यातूनही माझा वाढदिवस साजरा केला होता. रात्री खूप उशिरा एका मैत्रिणीने विचारलं, आज काय काय गिफ्ट्स मिळाली. मी म्हटलं, मुलांच्या मनातलं आदराचं स्थान, त्याचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि त्यांच्या शुभेच्छा ! पुष्कळ झालं. अजून काय हवं.
मुलांनो, तुमचे आभार कसे मानायचे? मला खरंच सुचत नाही. पण तुमचा हा लोभ असाच राहो हेच ईश्वराकडे मागणे. खूप मोठ्ठे व्हा !


रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

टू वीक्स - एक भावनिक थरार



भारतीय इडीयट बॉक्सवरच्या मालिकांमधला तोच तो मेलोड्रामा, तीच ती कथानकं आणि ओढून ताणून वाढवलेले भाग पाहून विटून गेले. चित्रपट पहावे म्हटलं तर त्यातही काही नाविन्य नाही. (काही अपवाद असतात हेही मान्य आहे.) रियालिटी शोमध्ये काहीच रिअल नाही आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये चाललेल्या धांगडधिंग्याला विनोद म्हणवत नाही. अशा स्थितीत मी वळले जरा पूर्वेकडे. (पाश्चात्यांचं आकर्षण तसं कमीच आहे मला.) मग दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स, जपान, चीन इथले कार्यक्रम पाहणं सुरु झालं आणि मग विरंगुळ्याचा एक वेगळाच मार्ग सापडला. यात सर्वाधिक भावलेल्या काही मालिकांबद्दल लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
टू वीक्स ही अशीच एक मालिका. अवघ्या २० भागात १४ दिवसांतील घटनाक्रम वेगाने उलगडत जातो. हा वेग इतका आहे की आपल्याला झपाटून टाकतो. (२० तासांची ही मालिका मी २ दिवसांत पाहून संपवली.) मालिकेची सुरुवात आयुष्याचा अर्थ हरवून बसलेल्या जांग ताय सनच्या बेफिकीर वागण्याने होते. कुणासाठी आणि का जगायचं हे अनुत्तरीत प्रश्न घेऊन ताय सन दिवस कंठतोय, अविचाराने वागतोय, मृत्यू केव्हाही समोर आला तरी मी मरायला तयार आहे असे सांगत एका पॉन शॉपमध्ये काम करतोय. अचानक ८ वर्षांपूर्वीची त्याची प्रेयसी इन हे त्याला भेटते. गर्भपात करण्यासाठी इन हेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आपण पळ काढला होता हे ताय सनला आठवतं. काही क्षण तो विचलित होतो. इन हे  तिच्या ल्युकेमिया झालेल्या ८ वर्षाच्या मुलीसाठी बोनमॅरो मागण्यासाठी ताय सनकडे आलेली असते. जगात एकट्या पडलेल्या ताय सनची भेट त्याच्या मुलीशी सू जीनशी होते. जीवनात आता एक आशेचा किरण उगवतोय असं वाटत असतानाच इन हे ताय सनला ती संग वू नावाच्या तरुणाशी विवाह करणार असल्याचे सांगते. सू जीनच्या मते तिचे वडील जगात नाहीत, ती संग वूला पिता म्हणून स्वीकारायला तयार आहे हे ऐकून ताय सन पुन्हा एकदा मनातून निराश होतो. सू जीनची सर्जरी २ आठवड्यांनी होणार असते. फक्त २ आठवडे आपल्याला स्वताला जपायला हवं. त्यानंतर कोणत्याही क्षणी आपण मृत्यूला कवटाळू असा निश्चय करून ताय सन हॉस्पिटलमधून बाहेर पडतो.
मात्र त्याचदिवशी काही भ्रष्ट मंत्र्यांकरवी एका खुनाच्या खटल्यात ताय सनला नाहक अडकवलं जातं. त्याला ठार मारण्याचे प्रयत्न होतात. सू जीनसाठी २ आठवडे जगलं पाहिजे या एका जिद्दीने ताय सन कोठडीतून पळून जातो. त्याचा शोध सुरु होतो. पोलीस अधिकारी असणारा संग वू सू जीनच्या सर्जरीसाठी रजेवर गेलेला असतो. मात्र त्याला रजा रद्द करून ताय सनच्या शोधाची जबाबदारी सोपवली जाते. तर जे क्योंग नावाची तरुण प्रोसिक्युटर मात्र ताय सन निर्दोष आहे हे सिद्ध करण्यातही धडपडत असते. ८ वर्षांपूर्वी जे क्योंगच्या वडिलांची हत्या केल्याच्या खोट्या आरोपाखाली ताय सनने शिक्षा भोगलेली असते. मात्र खऱ्या गुन्हेगारांना शासन व्हावं आणि पुन्हा एकदा ताय सनला न केलेल्या गुन्ह्याची सजा मिळू नये यासाठी जे क्योंगचे प्रयत्न सुरु असतात. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ताय सनचा संघर्ष सुरु होतो. सु जीनला बोनमॅरो देणारी व्यक्ती ताय सन आहे हे माहित नसलेला संग वू ही केस लवकरच संपवण्याचा निश्चय करतो आणि त्याच नादात ताय सनवर गोळ्या झाडतो. जखमी झालेला ताय सन दरीत कोसळतो. आणि पुढे काय होतं ते आपण प्रत्यक्षच पाहिलं पाहिजे.
एका अस्तित्त्व हरवलेल्या पित्याचा आपल्या मुलीला नवे जीवन देण्यासाठीचा, एका होणाऱ्या पित्याचा आपल्या भावी मुलीच्या सर्जरीसाठी तिच्या जवळ राहण्यासाठीचा आणि एका मुलीचा आपल्या दिवंगत पित्याला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा संघर्ष आहे. तर आजारी मुलगी, भलत्याच संकटात अडकलेल्या पूर्वायुष्यातील प्रियकर आणि त्याचा मागमूस धुंडाळणारा भावी पती यांच्यात इन हेची होणारी घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. घट्ट बांधलेलं कथानक, अचूक दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय आणि पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत जाणवणारा ताण आपल्याला खिळवून ठेवतो. दक्षिण कोरियाच नव्हे तर हॉलीवूडमध्येही अॅक्शन हिरो म्हणून नाव कमावलेल्या ली जुंग गीला (रेसिडेंट एविलमधला कमांडर चू आठवतोय का? हाच आहे तो.) हळवा बाप म्हणून पाहणं एक वेगळाच अनुभव आहे. आयरिस या मालिकेत अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स देणाऱ्या किम सो योनने प्रोसिक्युटर म्हणून गुन्हेगारांचा माग काढताना दिलेले अॅक्शन सीन्स बेस्टच. (आपल्या मालिकांमध्ये अॅक्शन सीन्स म्हणजे ?????) याखेरीज रु सू योंग याने रंगवलेला संग वू, सू जीनसाठी त्याची सततची घालमेल, ताय सन आपल्या भावी पत्नीच्या मुलीचा पिता आहे हे कळल्यानंतरही त्याने ताय सनला वाचविण्यासाठी केलेली खटपट, कर्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ घालताना त्याचा उडणारा गोंधळ आपल्याला त्याच्या जागी नेऊन उभा करतो. या सगळ्या घटनाक्रमांचा ताण मनावर असूनही सू जीनच्या समोर हसतमुखाने जाणारी, रोज रात्री गोष्टी सांगणारी ममताळू आई पार्क हा सूनने छान रेखाटली आहे. यांच्याखेरीज संपूर्ण मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा सर्व कलाकारांनी छान निभावल्या आहेत.
मला तरी ही मालिका खूप आवडली. मालिका कोरियन भाषेत असली तरी इंग्रजी सबटायटलच्या आधारे तुम्ही नक्कीच ही मालिका पाहू शकता. तुम्हालाही ही मालिका नक्की आवडेल अशी खात्री आहे.



मंगळवार, ३१ मे, २०१६

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले




पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!
सुरेश भट

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

दंगा




तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट

रिक्त




उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


सुरेश भट