गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक : महात्मा फुले

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
(११ एप्रिल १८२७ २८ नोव्हेंबर १८९०)



       महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शरीरशिक्षणही घेतले. लहूजीबुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले, मल्लविद्या संपादन केली. शिक्षण पुरे केल्यावर १८४० मध्ये जोतीरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून ५ किमी.वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतीरावांनीच पुरे केले. त्या स्वयंस्फूर्तीने जोतीरावांच्या समाजसुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या. शालेय शिक्षण चालू असताना जोतीरावांनी अनेक मित्र मिळविले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे, मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इ. मित्र शेवटपर्यंत जोतीरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिकटून राहिले. जगाचा, पश्चिमी देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन, अर्वाचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली. द राइट्‌स ऑफ मॅन(१७९१-९२) या टॉमस पेन (१७३७-१८०९) याच्या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केलीमानवी समतेचा आणि स्वातंत्र्याचा ध्येयवाद आत्मसात केला. या तत्त्वांच्या आधारे ते भारतीय समाजाचे, विशेषतः हिंदू समाजाचे, उत्कृष्ट चिंतन करू शकले. संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले. वेद, स्मृती, पुराणे यांच्यातील कथांचा अभ्यास केला. अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले वज्रसूची हे उपनिषद त्यांना फार आवडले. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा खोटा आहे, हे तत्त्व स्पष्ट रीतीने मांडले आहे. कबीराच्या बीजक ग्रंथातील ‘विप्रमति’ या प्रकरणाचा त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला. त्यांनी एका ठिकाणी स्वतःचा ‘कबीर साधूच्या पंथाचा’ असा निर्देश केला आहे. अशा चिंतन मननाने त्यांची भारतीय समाजक्रांतीची विचारसरणी तयार झाली. जगातील क्रांतिकारकांच्या नेत्यांमध्ये शोषित समाजातून पुढे आलेले यांच्यासारखे नेते फार थोडे, कार्ल मार्क्स, लेनिन इ. मध्यमवर्गीय नेते कामगारक्रांतीचे पुरस्कर्ते झाले. फुले, आंबेडकर हे शोषित समाजातून निर्माण झाले. हे त्यांचे वैशिष्ट्य होय.

म. जोतीराव फुले आणि म. फुले यांची स्वाक्षरी


जोतीरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर, सूत्रबद्ध सारांश सांगितला आहे - ‘‘विद्येविना मति गेलीमतीविना नीति गेलीनीतीविना गति गेलीगतीविना वित्त गेलेवित्ताविना शूद्र खचलेइतके अनर्थ एका अविद्येने केले.’’ त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्याचा आसूड (१८८३) मध्ये प्रारंभी सांगितला आहे. त्यांच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे. प्रचलित हिंदू धर्मसंस्था, त्यावर आधारलेली हिंदूंची समाजरचना व ब्रिटिशांची शासनसंस्था व सर्वांचा समुच्चित परिणाम म्हणजे शूद्र शेतकऱ्यांचे आणि दलितांचे सध्या दिसणारे अपार दैन्य होयया दैन्यावस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांनी लोकशिक्षण हाच मुख्य उपाय होय, असे ठरविले. अज्ञानग्रस्त शूद्रअतिशूद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहेत त्याचप्रमाणे स्त्री जातदेखील पुरूष वर्गाच्या दास्यात युगानुयुगे सापडली आहेहे लक्षात घेऊन जोतीरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली (१८४८). त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता. जातिभेदाची आणि पवित्र रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता. त्यास फार थोडे अपवाद होते. सुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात-जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत. जातिबहिष्काराचे असहाय असे दडपण क्रियावान सुधारकांना सोसावे लागलेजिवलग नातेवाईकांचा विरोध होत असे. उदा.,  जोतीरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा व सून यांना घराबाहेर काढले आणि खुद्द माळी समाजाने नाना प्रकारे अवहेलना चालू केली. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन जोतीराव व सावित्रीबाई यांची समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या (१८५१). अस्पृश्यांसाठी शाळा काढली. या त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाजसुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला. १८५२ मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली जोतीरावांच्या शिक्षणकार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.


त्यावेळचे सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांची दास्यातून आणि दुःस्थितीतून सोडवणूक करण्याकरता प्रयत्नशील झाले होते. हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवाविवाह निषिद्ध मानला होता. बालपणी आणि वारंवार उद्‌भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे पतिनिधन होऊन तरूणपणीच वैधव्य आलेल्यांची संख्या मोठी होती. केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात होती. समाजाची आणि कुटुंबाची त्यांच्यावर करडी नजर असे. बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली. या चळवळीला जोतीरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता. तारुण्यकाली स्वाभाविकपणे वासनेला बळी पडलेल्या विधवांची फार विटंबना होत होती. गर्भपाताचे प्रयत्न होत, जन्मलेल्या बालकांची हत्याही होई. त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली (१८६३). या गृहात अशा स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय केली होती. जोतीरावांनी पुढे जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता न्हाव्यांचा संपही घडवून आणला.

अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणे चालना दिली. अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही एक अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला.

महाराष्ट्रातील तत्कालीन भिन्न मतांच्या व विचारसरणींच्या समाजसुधारकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये जोतीरावांचा सहभाग नेहमीच असे. उदा.आर्य समाजाचे संस्थापक स्वामी  दयानंद सरस्वती (१८२४-८३) यांची पुणे येथे  महादेव गोविंद रानडे (१८४२-१९१०) प्रभृती सुधारकांनी मिरवणूक काढली. त्याचे पुढारीपण जोतीरावांनी केले. उलट जीर्ण मतवादी रूढीनिष्ठांनी या मिरवणुकीची थट्टा व विडंबन करण्याकरिता गर्दभानंदांची दिंडी सुरू केली (१८७५).

 
फुले हे १८७६-८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. समाजाच्या मौलिक परिवर्तनाकरिता समाजरचनेतील धर्मभेदमूलक विद्वेष, जातिभेदमूलक उच्च-नीच भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तिपूजा, संस्कृत भाषेतील कर्मकांड इ. गोष्टींचे उच्चाटन करून समताप्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती करण्याकरिता  सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ मध्ये फुले यांनी केली. या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य व्हावेत, अशी योजना केली होती. फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यावेळच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची पिळवणूक चालली होती. परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज सापडला होता. या हिंदू धर्माच्या पारलौकिक विचारसरणीचा प्रवर्तक व समर्थक वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. बहुजन समाजावर ब्राह्मणांनी लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब (१८६९)गुलामगिरी (१८७३)सत्सार (अंक १ व २, १८८५) इ. निबंध लिहिले. या निबंधांमधून पुराणातील अवतारांच्या कथांचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे, त्यांनी भारत जिंकला आणि येथल्या तथाकथित शूद्रातिशूद्र शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले व ते आतापर्यंत चालू राहिले, असा भावार्थ काढला आहे. श्रमिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीचे उत्कृष्ट चित्र शेतकऱ्याचा आसूड या विस्तृत निबंधामध्ये फुले यांनी रेखाटले आहे. ही शेतीच्या आर्थिक दुरवस्थेची समस्या अजूनही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ३२ वर्षे होऊन गेली तरी सुटलेली नाही. या निंबधामध्ये भारतीय ग्रामोद्योग किंवा कुटिरोद्योग ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणाने कसे ढासळले आहेत, याचेही हृदयविदारक वर्णन केलेले आहे. शेतीचा धंदा आधुनिक तंत्रविज्ञानावर उभारावा आणि ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रविद्येचा आधार द्यावा, अशी उपाययोजना फुले यांनी या निबंधात सुचविली आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतो, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे.

डावीकडून : (१) भिडे वाड्यातील पहिली मुलींची शाळा, (२) हरिजनांसाठी खुली केलेली विहीर व (३) अहिल्याश्रम.


सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या निंबधात (मृत्यूनंतर प्रसिद्ध, १८९१) फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या विश्वकुटुंबवादाची सुसंगत मांडणी केली आहे. हा निबंध लिहीत असताना त्यांना पक्षाघात झाला होता. अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पुरा केला. यात स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मुलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी, हे सांगितले आहे. ज्या तत्त्वांच्या आधारावर अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती झाली तीच तत्त्वे या पुस्तकात भारतीय समाजरचनेच्या संदर्भात मांडली आहेत. यात सांगितलेला सत्यधर्म हा ‘यूटोपियाच होय. जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांत्या युटोपियन ध्येयवादाने प्रेरित झालेल्या दिसतात. फुले म्हणतात-‘‘स्त्री अथवा पुरूष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मताच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे, या सर्व स्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौद्ध धर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म.’’ यात आर्थिक समता सूचित केली आहे आणि सर्वधर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे.

फुले यांनी अखंडादि काव्यरचना (१८६९) केली आहे आणि काही काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्येही अखेरीस घातली आहे. यात निर्मात्याने केलेल्या विश्वरचनेबद्दल जिव्हाळा प्रकट झाला आहे. शब्दकळा रसाळ आहे.


जोतीराव फुले यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ( १८३१-९७) यांनी अनन्यभावाने आयुष्यभर सहकार्य दिले. स्त्रीमुक्तिआंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास त्यांची दखल जरूर घेईल. जोतीरावांची सगळी विचारसरणी त्यांनी आत्मसात केली होती, जोतीरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. त्यांनी काव्यरचनाही केली आहे. काव्यफुले (१८५४)मातुश्री सावित्रीबाई भाषणे व गाणी (१८९१)बावनकशी सुबोधरत्नाकर (१८९२)जोतिबांची भाषणे (१ ते ४-संपा.) इ. त्याचे उपलब्ध साहित्य आहे.



पश्चात प्रभाव :
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी महात्मा फुलेनावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतीबांच्या जीवनावर असूडनावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.

जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.


जोतीरावांचे इतर वाङ्‌मय पुढीलप्रमाणे आहे : 

·         तृतीय रत्न
·         छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा
·         विदयाखात्यातील ब्राह्मण पंतोजी
·         ब्राह्मणांचे कसब
·         गुलामगिरी
·         पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
·         सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकिगत
·         पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
·         दुष्काळविषयक विनंतीपत्रक
·         हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
·         शेतकर्‍याचा असूड
·         महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
·         मराठी ग्रंथकार सभेस पत्र
·         सत्सार अंक १
·         सत्सार अंक २
·         इशारा
·         ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर 100 percents.svg
·         मामा परमानंद यांस पत्र 100 percents.svg
·         सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि
·         सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक
·         अखंडादि काव्यरचना
·         ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांस पत्रे
·         महात्मा फुले यांचे उईलपत्र (मृत्युपत्र)


जोतीबा फुले यांच्या जीवनावरील साहित्य

·         महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कऱ्हाडे
·         महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखिका : गिरीजा कीर
·         महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
·         महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
·         महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
·         महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
·         महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
·         पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
·         महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
·         महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
·         महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
·         महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
·         महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
·         महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
·         महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
·         महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
·         महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत
·         महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
·         महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
·         महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
·         महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
·         महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
·         महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार
·         महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
·         महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
·         महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
·         महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. मंगुडकर
·         महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
·         महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
·         महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
·         महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी
·         महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
·         महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
·         महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
·         महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
·         महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
·         महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
·         महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
·         युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
·         सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे.
·         महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
·         मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर
·         असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
·         क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
·         महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे


जीवनपट
·         इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
·         इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
·         इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
·         इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
·         इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
·         इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
·         इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
·         इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
·         सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
·         इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
·         मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
·         नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
·         इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
·         इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
·         इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
·         इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
·         इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
·         इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
·         इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
·         इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
·         इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
·         इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
·         इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
·         इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
·         इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
·         इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
·         इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
·         इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
·         इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
·         इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
·         इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
·         इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
·         २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

संदर्भ :
 1. Keer, Dhananjay, Mahatma Jotirao Phooley : Father of our Social Revolution, Bombay, 1974.
   २. कीर, धनंजयमहात्मा ज्योतीराव फुलेमुंबई, १९६८.
   ३. कीर, धनंजयमालशे, स. गं. संपा.  महात्मा फुले : समग्र वाङ्‌मयमुंबई, १९६९.
   ४. जोशी, लक्ष्मणशास्रीज्योति निबंध, वाई, १९४७.
   ५. माळी, मा. गो. क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुलेगारगोटी, १९८०.




२ टिप्पण्या: