शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

मराठी कवितेचा इतिहास

प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत (इ.स.२०००) मराठी कवितेची वाटचाल कशी होत गेली, कोण कोणती नवी वळणे, नवी रुपे तिने धारण केली, आणि त्या प्रत्येक कालखंडामध्ये कोणकोणते मुख्य कवी निर्माण झाले, त्यांच्या कवितेने मराठी कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती कशी बदलत गेली याचे विहंगमावलोकन प्रस्तुत लेखात केलेले आहे. आत्तापर्यंत `मराठी' तून लिहिणारे दोन कवी -कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांना साहित्य प्रांतातील, भारतातील सर्वोच्च पुरस्कार `ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झालेला आहे. मराठी कविता वैयक्तिक आहे, सामाजिक व राष्ट्रीय आहे, तसेच ती वैश्विकही आहे. वैयक्तिक अनुभव, सुख-दु:खे, मराठी बाणा, देशभक्ती, सामाजिकता इत्यादी सर्व क्षेत्रांना व्यापणारी अशी मराठी कविता आहे. कवींची अभिव्यक्ती तसेच रसिकांना विविध प्रेरणा व आनंद ही दोन्ही उद्दिष्टे लक्षणीयरीत्या साधणारी कविता म्हणजे मराठी कविता होय.
(
कवितेचा एकूण कालखंडाचा आवाका प्रचंड आहे आणि लेखाची एकंदर स्थलमर्यादा लक्षात घेता अनेक कवींचा उल्लेख राहुन गेलेला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. परंतु उल्लेख न केलेले कवी देखील महत्त्वाचे असू शकतात याचे भान नक्कीच आहे! अधिकाधिक सर्वस्पर्शी माहिती देण्याचा प्रयत्न आहे.)
मराठी कवितेचा इतिहास :
वास्ताविक मराठी वाङ्मयाचा इतिहास प्राचीन नसुन मध्ययुगीन म्हणावयास हवा. मराठी भाषेचा गौरव सर्वप्रथम जर कोणी केला असेल तर तो एक पोर्तुगीज माणसाने, ही घटना निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल.
भारताच्या सुवर्णभूमीचे आकर्षण वाटून इ.स.१४७८ साली वास्को -द-गामा व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आला आणि भारताचे प्राक्तन बदलून गेले. १५६७ पासुन ख्रिस्ती धर्मप्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी धर्मपरिषदा भरु लागल्या. नव्या धर्माविषयी मराठी माणसाला प्रेम वाटावे आणि भक्तिकथा सरयुक्त मराठी पुराणांना पर्यायी अशी रचना असावी म्हणुन फादर स्टीफन्स या परकीय धर्मप्रसारकानी येशु ख्रिस्ताची महती सांगणारा ख्रिस्तपुराण हा ग्रंथ मराठी भाषेत लिहुन महराष्ट्र सारस्वतामध्ये मानाचे स्थान मिळविले.
मुकुंदराज : मराठीचे आद्यकवी
मुकुंदराजांचा विवेकसिंधु हा मराठी मधील पहिला ग्रंथ इ.स. ११८८ मध्ये लिहिला गेला. त्या काळामध्ये सर्व प्रकारचे शास्त्रीय, ज्ञानात्मक विवेजन हे संस्कृत भाषेमध्ये होत असे. मराठी सारख्या देशी भाषेतुन ग्रंथ लिहिण्याची प्रथाच नव्हती. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये जे अपरंपार ज्ञानभांडार होते, त्यापासून मराठी सामान्यजन वंचित रहात होता. हे ज्ञानभांडार मराठीमध्ये आणणे आवश्यक आहे हे मुकुंदराजांनी ओळखले. आणि म्हणून तत्कालीन सर्व संकेत बाजुला ठेऊन मुकुंदराजांनी आपला ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. मुकुंदराजांच्या या कृतीनंतर अठराव्या शतकापर्यंत सर्व प्रमुख कवींनी आणि ग्रंथकारांनी मराठी भाषेत कवित्व तसेच तात्विक विवेचन करण्याचे धाडस आणि समर्थन केले आहे. असे असले तरी वैदिक संस्कृतीचा मराठी संस्कृतीशी प्रथम सांधा जुळविला तो मुकुंदराजांनी!
चक्रधरस्वामी आणि त्यांचा महानुभावपंथ
बाराव्या शतकाच्या अखेरीस मुकुंदराजांनी जे कार्य केले ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभाव पंथाने अतिशय नेटाने पुढे नेले. संस्कृत हीच ज्ञानभाषा आहे' हा संकेत महानुभाव पंथानेही धुडकावून दिला. आणि ज्ञानाभिव्यक्तिचे सुलभ साधन म्हणून मराठी भाषेचा गौरवाने स्विकार केला.
महानुभाव लेखकांचे सात ग्रंथ साती ग्रंथ म्हणुन प्रसिद्ध आहेत.
१. शिशुपाल वध - शक ११९५ - कवी भास्करभट बोरीकर
२. एकादशस्कंध - शक ११९६ - कवीश्वर भास्कर
३. वत्सहरण - शक १२०० - दामोदरपंडित
४. रुक्मिणीस्वयंवर - शक १२१० - कवी नरेंद्र
५. ज्ञानबोध - शक १२५४ - विश्वनाथ बाळापूरकर
६. सह्याद्रिवर्णन - शक १२५४ - खळो व्यास
७. ऋद्धपुरवर्णन - शक १२८५ - नारायण पंडित
आद्य कवयित्री महादंबा
महानुभाव पंथातील महदंबाकृत धवळे हे एक रसाळ काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान जातो.
महानुभाव पंथातील या लेखकांनी व कवींनी मराठी भाषेचे ऐश्वर्य व सामर्थ्य वाढविण्याचे काम केलेले आहे. त्यांनी बाळगलेला मराठी भाषेचा अभिमान हा मराठी भाषेवर मोठे उपकारच म्हणावे लागेल.
संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी केलेला मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेचा अतिशय ज्वलंत अभिमान आणि उत्कट प्रेम ज्ञानदेवांनी ज्ञानेश्र्वरीमध्ये जागोजागी व्यक्त केलेला. आपली मराठी भाषा ही प्रौढ व रसाळ आहे ह्याची सार्थ जाणीव त्यांना आहे.
माझा मर्हाठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातेंहि पैजासि जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन
अशा शब्दात त्यांनी मराठीचा गौरव केला आहे. आद्यकवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्र्वर महराज यांच्यामध्ये एका शतकाचे अंतर आहे. दोघांचाही संप्रदाय व तत्त्वज्ञान एकच आहे. (नाट्यसंप्रदाय) या दोघांनीही अद्वैत सिद्धांताचा मराठी भाषेत प्रसार केला. संस्कृत भाषेचे जसे एक अंगभूत लावण्य आहे तसेच मराठी भाषेचेही अंगभूत लावण्य आहे हे ज्ञानेश्र्वर महाराजांनी ज्ञानेश्र्वरी या ग्रंथातून दाखवून दिले. श्रीगुरु, कृष्णार्जुन, गीता, संत, मराठीभाषा, भक्तिज्ञानावैराग्य या सर्वांविषयी उत्कट प्रेमभावना ज्ञानेश्र्वरी या ग्रंथात आहे. विश्वाच्या वाङ्मयात हा ग्रंथ थोर समजला जातो.
संत नामदेव
वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणुन लोकप्रिय होते. अत्युत्कट भक्तिप्रेमाने ओथंबलेली अभंगराचना त्यांनी केली. या भक्तिभावाच्या जोरावर त्यांनी ज्ञानदेवांचे व समकालीन संतमंडळींचे प्रेम जिंकले. नामदेवांची सर्व रचना स्फुट अभंगाची आहे.
वारकरी संप्रदायातील संतकवींच्या काव्याचे स्वरूप 
आपल्याकडे भावकविता हा शब्दप्रयोग, आधुनिक कवितेच्या संदर्भात मुख्यत: वापरला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की पुर्वी भावकविताच नव्हती. संतांच्या काव्यात ओवी, अभंग, गौळणी, पदे, लोकगीते, विराण्या, पाळणे, भूपाळ्या, लावण्या अशा विविध स्वरुपात भावकविताच अविष्कृत झालेली आहे. अशी विशुद्ध भावकविता लिहिणारे संत कवी म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत चोखामेळा, समर्थ रामदास इत्यादी सर्वच संतांचा उल्लेख करायलाच हवा.
संत कवयित्री
मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, भागु आणि कान्होपात्र या संतकवयित्रिंनी आपल्या भावसंपन्न कवितेने मराठी कविता समृद्ध केली.
मुक्ताबाईंचे मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्याशी हा कूटरचनापर अभंग किंवा त्यांचे
मजवरी दया करा। ताटी उघडा ज्ञानेश्र्वरा हे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत.
जनाबाईंनी विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा मेळा।
असे वारकरी संप्रदायाचे हृदयंगम चित्र रेखाटले. त्यांच्या
डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी
हा अभंग अतिशय प्रक्षोभक, स्त्रीजाणिवेचा आदय हुंकार म्हणावा लागेल.
सोयराबाईंचा रंगी रंगला श्रीरंग। अवघा रंग एक झाला हा अभंग आजही अवीट गोडीने ऐकला जातो. संत कवयित्रींच्या काव्यरचनेमध्ये वेगवेगळे आकृतिबंध दिसतात. पुढील काळातील कवयित्रींनाही ते मार्गदर्शक ठरते आहे.
पंडिती काव्य :
तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील शेवटचे कवी मानले जातात. त्यापुढील कालखंडात म्हणजे १६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले. या कालखंडाला वामन-मोरोपंतांचा कालखंड म्हटले जाते. या कालखंडाने मराठीच्या भांडारात अपार भर घातलेली आहे. मध्वमुनीश्वर, अमृतराय, महिपति, वामनपंहित, मोरोपंत हे महत्त्वाचे कवी या कालखंडात झाले. या कवींनी फक्त निवृत्तीपर रचना केली नसुन प्रवृत्ती-निवृत्ती यांचा मिलाफ त्यांच्यामध्ये झालेला आहे. या काळातील काव्य वैराग्याकडून संसाराकडे वळत चाललेले दिसते. पुढे शाहिरी काव्याने तर शृंगार रसाचा कळस गाठला.
शाहिरी काव्य :
शाहिरी काव्य म्हटले की पोवाडे आणि लावण्या हे दोन रचना प्रकार चटकन डोळ्यासमोर येतात. पोवाडा आणि लावणी यांचे मुळ अस्सल मर्हाटी आहे. शाहिरी वाङ्मयाची सुरुवात शिवकालात झाली आणि नाट्य, नृत्य, संगीत या अंगाने तिचा विकास पेशवाईत झाला. मुख्यत: जनसमुदायाच्या रंजनासाठी म्हणुन लावणी, पोवाडे रचले नि गायले गेले. मन्मथस्वामी, ज्योतीराम, प्रभाकर, होनाजी बाळा, सगनभाऊ, परशराम, रामजोशी हे त्या काळातील महत्त्वाचे शाहिरी कवी होत.
प्राचीन मराठी काव्याचा हा इतिहास पाहिला तर तो संत, पंत आणि तंत अशा कवींच्या कामगिरीवर विभागलेला आहे. पहिल्या कालखंडाने अध्यात्माची व निवृत्तीची शिकवण दिली. पुढील कालखंडात माहपती मुक्तेश्वर, श्रीधर यांनी आपल्या रसाळ ग्रंथांनी मराठी भाषा जोपासली, वाढविली आणि तिसर्या कालखंडात ती अधिक तरुण बनली. विविध रस तिच्यातून व्यक्त होऊ लागले.
पुढे १८१८ मध्ये स्वराज्याचा अस्त झाला आणि मराठी काव्यही निस्तेज झाले. १८८५ पासुन मात्र पुन्हा एकदा मराठी काव्य जोमाने पुढे आले.
अर्वाचीन मराठी कविता

१८८६ ते १९२० हा कालखंड अर्वाचीन मराठी कवितेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये मराठी काव्याच्या नव्या युगाची नांदी झाली. या आधीच्या कालखंडात संतकाव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य, अशा तीन काव्यधारा होत्या. या तीनही परंपरा हळूहळू क्षीण होत गेल्या. १८८५ च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला. व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि सौदर्यवाद या दोन महत्त्वाच्या प्रवृत्तींचा संस्कार प्रभावी मराठी मनावर झाला. या सौदर्यवादी जाणिवा वाङ्मयाला पोषक ठरल्या. विशेषत: कवितेवर या सौंदर्यवादाचा मोठा प्रभाव पडला.
१८८५ मध्येच आधुनिक कवितेची चाहूल विष्णु मोरेश्र्वर महाजनींच्या कुसुमांजली आणि महादेव मोरेश्र्वर कुंटे यांच्या राजाशिवाजी या दोन काव्यांमधून लागली. आशय आणि अभिव्यक्ति या दोनही अंगाने मराठी कवितेचे रुप आमुलग्र बदलणार याची चिन्हे दिसू लागली.
केशवसुत : आधुनिक मराठी कवितेचे जनक
केशवसुतांची पिढी इंग्रजी भाषा शिकलेली, त्या भाषेतील साहित्याने प्रभावित झालेली पहिली पिढी होती. खुद्द केशवसुतांवर कीटस्, शेली, वर्डस्वर्थ यांचा संस्कार झालेला होता. 
केशवसुतांच्या आधी मराठी काव्याचे विषय देव-देवता, नीति-अनीती, राजे-राजवाड्यांच्या पराक्रमाचे वर्णन यांपुरतेच मर्यादित होते. संतकाव्यामागील लेखनप्रेरणा मुख्यत: आध्यात्मिक होती. पंडिती कवींनी वैयक्तिक भावभावना वर्ज्य मानल्या होत्या. आणि शाहिरी काव्य राजे-रजवाड्यांच्या स्तुतिपलीकडे पोचत नव्हते. अशा पार्श्र्वभुमीवर केशवसुतांनी ऐहिक विषय; लौकिक भावभावना यांची आपल्या काव्यामधून अभिव्यक्ती केली. भावगीत हेच काव्याचे खरे क्षेत्र आहे हे प्रथमत: केशवसुतांनी दाखवुन दिले. केशवसुतांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या.
१. विशुद्ध भावगीतात्मक जाणीव २. प्रणयप्राधान्य भावनेला महत्त्व ३. निसर्गप्रेम
४. सामाजिक विचार ५.गूढगुंजन ६.सुनीत हा नवा काव्यप्रकार
ह्या भावभावना, हे घटक / विषय, नवे काव्यप्रकार कवितेत समाविष्ट केले. अशी आशय आणि अभिव्यक्ति या दोन्ही बाजुने केशवसुतांनी मराठी काव्यामध्ये बंडखोरी केली. हरपले श्रेय, तुतारी, नवा शिपाई, झपुर्झा, स्फुर्ती, सतारीचे बोल - अशा एकाहून एक श्रेष्ठ कविता लिहून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचे रुप सिद्ध केले. आधुनिक मराठी कवितेतील सर्व प्रवाह - उदा. सामाजिक व राष्ट्रीय कविता, गूढ गुंजनात्मक कविता इत्यादी... केशवसुतांच्यात कवितेपासून सुरू झाल्याचे दिसतात म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे `जनक' म्हटले जाते.
केशवसुतांच्या काळात नारायण वामन टिळक हे ही एक महत्त्वाचे कवी होते. मात्र आवर्जुन नाव घ्यायला हवे ते बालकवी उर्फ त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे! बालकवींच्या कवितेत सौंदर्यवादाच्या प्रेरणा अतिशय उत्कटपणे एकवटलेल्या आहेत. आत्यंतिक निसर्गप्रेम, दिव्यत्वाची अनावर ओढ, उत्कट आणि प्रगाढ उदासिदनता, चैतन्याचा निजध्यास ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. फुलराणी, खेड्यातील रात्र, उदासिनता, औदुंबर, तडाग असतो, श्रावणमास या त्यांच्या कविता मराठी काव्यामध्ये अजरामर आहेत. 
गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी हे देखील आधुनिक मराठी कवितेच्या संदर्भातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी होते. अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटलेल्या होत्या. अभिजातवाद आणि सौंदर्यवाद यांचे एक चमत्कारिक मिश्रण त्यांच्यामध्ये दिसते. त्यांच्यामध्ये अफाट प्रतिभासामर्थ्य होते यात शंका नाही. विफल प्रीतीची कविता हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विनोद हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. विहिणींचा कलकलाट, हुकमे हुकूम, चिंतातुर जन्तू, एक समस्या अशा काही विनोदी कविता प्रसिद्ध आहेत. 
या कवींसोबत कवी दत्त, माधवानुज, रेंदाळकर, बी. नागेश रहाळकर, कृ. ना. आठल्ये, मो. वा कानिटकर, ग.ज.आगाशे, सुमंत, साधुदास या कवींनी आधुनिक मराठी कवितेच्या जडणघडणीस हातभार लावला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
सावरकरांच्या जीवनात साहित्यनिर्मितीला दुय्यम स्थान असले तरी मराठी काव्यक्षेत्रात त्यांचे नाव कोरले गेलेले आहे. वीररस, देशभक्ती, कल्पनेचे भव्यत्व, विचारप्रधानता, तरल भावुकता इत्यादी दर्शन त्यांच्या काव्यात घडते. सागरास(ने मजसि ने...), माझे मृत्यूपत्र, कमला, गोमंतक अशा कविता प्रसिद्ध आहेत. जयोस्तुते हे स्वातंत्र्यदेवतेचे गीत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची `जयदेव जयदेव जयजय शिवराय' ही आरती यांवरूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तिदायी काव्यप्रतिभेची जाणीव आपल्याला होते.भास्कर रामचंद्र तांबे
तांबे यांनी अतिशय विलोभनीय प्रणयगीते लिहिली. अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन, रूपकात्मक रचना ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. नववधू प्रिया मी पुर्णाहुति, निरोप घेताना, रुद्रास आवाहन, रिकामे मधुघट, पन्नास वर्षानंतर अशा त्यांच्या अनेक कविता अजरामर आहेत.

१९२० ते १९४७ आधुनिक मराठी कवितेचा दुसरा टप्पा :
आधुनिक मराठी कवितेचा हा कालखंड विविध प्रवृत्ती, प्रवाह, उपप्रवाह व प्रेरणा यांनी गजबजलेला आहे.
रविकिरण मंडळ :
अर्वाचीन मराठी कवितेच्या वाटचालीमध्ये रविकिरणमंडळाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. माधव (ज्युलियन) पटवर्धन, श्री. बा. रानडे, मनोरमा रानडे, गजानन माडखोलकर, द.ल. गोखले, शंकर कानेटकर, यशवंत पेंढरकर, शंकर काशिनथ गर्गे उर्फ दिनाकर (जे नंतर मंडळातून बाहेर पडले) आणि वि. द. घाटे असे सदस्य यात होते. त्या काळात (१९२३ च्या दरम्यान) या मंडळाला अफाट लोकप्रियता मिळाली. आधुनिकतेची प्रेरणा हे रविकिरणमंडळाचे वैशिष्ट्य होते. बोली भाषेशी जवळीक साधणारी, स्वाभाविक, थेट अशी या कवींची शैली होती. आधुनिक परंतु वास्तव चित्रणाला सामोरी जाणारी कविता त्यांनी लिहिली. माधव ज्युलियन, कवी गिरीश, यशवंत या कवींना अफाट लोकप्रियता मिळाली. याच काळात प्र. के. अत्रे उर्फ केशवकुमार यांचे झेंडुची फुले हे विडंबनात्मक काव्य गाजले. याशिवाय ग.ल. ठोकळ यांचे सुगी, तसेच ग.ह. पाटील, के. नारखेडे, सोपानदेव चौधरी, वि. भि. कोलते, ना. घ. देशपांडे, कवी आनंद यांची जानपद गीते यांचा उल्लेख करायला हवा.
कवी अनिल
मराठी कवितेचा प्रवाह आधुनिक आणि गतिमान करण्यात अनिलांचा मोठा वाटा आहे. त्यांचा फुलवात हा कवितासंगह १९३२ मध्ये आला. ओवी, अभंग, अष्टाक्षरीसारया रचनाबंधाचा वापर त्यांनी केला. कवितेत नवे प्रयोग केले. अनिलांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. मराठी कवितेचे प्रयोगशील वळण त्यांच्या कवितेतून दिसते.
ना. घ. देशपांडे हेदेखील एक महत्त्वाचे कवी. रानात गेली बाई शीळ किंवा नदीकिनारी... या सारख्या गीतांनी त्यांनी रसिकांना वेडे केले.
अनंत काणेकरांच्या - चांदरात आणि इतर कविता यांनाही भरपूर लोकप्रियता मिळाली.
बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज :
१९३५-४५ या दशकातले हे दोन महत्त्वाचे कवी. धुंद काव्यात्म सौर्द्यवृत्ती हे बोरकरांचे वैशिष्टय म्हणता येईल. कवितेचा गेय अविष्कार हे बोरकरांच्या कवितेचे वैशिष्टय म्हणता येईल. परंतु त्यामागील भावपर वृत्तीही तितकीच महत्त्वाची आहे. प्रतिभा, जीवनसंगीत, आनंदभैरवी, दुधसागर हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे बोरबकरांना समकालीन कवी. कुसुमाग्रजांनी सुरुवातीपासूनच कवितेचा स्वतंत्र घाट घडविण्याचा प्रयत्न केला. विशाखा मध्येही त्यांची स्वतंत्र्य वृत्ती दिसते. त्याचबरोबर आधुनिक मराठी कवितेचा सगळा वारसा तिने आत्मसात केला आहे हे जाणवते.
त्यांचे `विशाखा' सह जीवनलहरी, किनारा, रसयात्रा, वादळवेल, स्वगत, मेघदूताचे मराठी रूपांतर इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
नवकाव्याचे प्रणेते : बा. सी. मर्ढेकर
१९४५ नंतर मराठी काव्यविषयक दृष्टीकोनात मोठा फरक दिसतो. केशवसुतांपासून सुरु झालेला आधुनिक कालखंडाचा इथे शेवट होतो. कारण येथवरची कविता रोमँटिक जाणिवेतून स्फुरत होती. यानंतर मात्र अॅन्टी रोमँटिक जाणिवेला महत्त्व मिळाले. १९४७ साली मर्ढेकरांचा काही कविता हा संग्रह आला आणि त्यातून प्रथमच नवकाव्याचे दर्शन घडले. अत्यंत विदारक आशय, अर्थशून्यतेचा प्रत्यय, भाषेची मांडणी, विक्षिप्त प्रतिमा, तिरकस शैली ही त्यांच्या कवितेची काही वैशिष्ट्ये! त्या काळातल्या किंवा त्या आधीच्या काळात असलेल्या सौंदर्यवादी कवितेपेक्षा मर्ढेकरी कविता वेगळी होती. या कवितेमागचे अनुभवविश्व वेगळे होते, या कवितेचे भावविश्व, तसेच कवितेतील प्रतिमासृष्टीही खूपच निराळी होती. आदर्शवाद, स्वप्नरंजन यांकडून कविता मानवी सु:खे, दैनंदिन जीवन, स्त्री-पुरुष संबंध यांकडे वळली. सौंदर्यवादाकडून वास्तववादाकडे मराठी कवितेची वाटचाल त्यांच्या कवितेच्या रुपाने होळ लागली. मात्र बोरकर आणि कुसुमाग्रज यांनी याच काळात नवकवितेचे विशेष आत्मसात करुनही सौंदर्यवादी कवितेची धारा कायम ठेवली.
वा. रा. कांत हे मराठवाड्यातील मुलत: सौंदर्यवादी आहेत. वेलांटी, मरणगंध, वाजली विजेची टाळी हे त्यांचे कवितासंग्रह होते. त्यांच्या कवितेने नवकाव्याचे संस्कार पचवलेले आहेत.मनमोहन हे देखील एक महत्त्वाचे कवी आहेत. शंकर वैद्यांनी आदित्य या नावाने त्यांच्या कवितांचे संपादन केले आहे.
१९४७ ते १९६० हा कालखंड नवकवितेचा मानला जातो. या नवकाव्याचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर होते पण वरील सर्वच कवींनी आपल्या काव्यलेखनाने नवकवितेचे रुप सिद्ध केले. भावनांचे नाटकी उदात्तीकरण टाळून वास्तववेधी काव्य लिहिणे, मुक्तछंदाचा वापर, आशय व आविष्कार यांतील अभिन्नता, कणखर निराशावाद, यंत्रयुगीन वास्तव ही या नवकवितेची वैशिष्ट्ये होती. अनिल, कुसुमाग्रज, बोरकर, पु.शि.रेगे, शरदचंद्र मुक्तिबोध यांनी नवकवितेचे विशेष आत्मसात करीत आपल्या पिंडाला साजेशी कविता लिहिली. परंतु बापट, पाडगावकर, करंदीकर यांनी नवकवितेला सर्वात अधिक आत्मसात केले. परंपरेतील वैशिष्ट्ये टिकवून ठेवत नवतेला स्विकारणे हेच मराठी कवितेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
मराठी स्त्री कवयित्री :
इंदिरा संत, पद्मा, संजीवनी मराठे, शांता शेळके यांनी रविकिरण मंडळाच्या काळात कवितालेखन सुरु केले. इंदिरा संत यांची कविता सर्वात प्रभावी ठरली. शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या हे त्यांचे महत्त्वाचे कविता संग्रह. शांता शेळके यांनी गीतरचनेमध्ये अपूर्व कामगिरी केली. याशिवाय पद्मा लोकूर, शिरीष पै, मल्लिका अमशेख, अंजली ठकार, प्रभा गणोरकर, अनुराधा पोतदार यांनी उल्लेखनीय काव्यलेखन केले.
साठोत्तरी कविता : (१९६० नंतरची कविता)
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याचा विचार करताना दोन कालखंड महत्त्वाचे आहेत. १९४७ ते १९६० व १९६० नंतरचा दुसरा कालखंड. पहिल्या कालखंडाचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर यांचे १९५६ मध्ये निधन झाले. १९६० च्या सुमारास स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भ्रमनिरास अधिक तीव्र झाला. दलित जाणिवेला अनयायाची प्रखर जाणिव झाली. बेकार तरुण वर्ग संतप्त होता. या आर्थिक, सामाजिक, राजकिय परिस्थितीचा वाङ्मयावर प्रभाव पडत होता. संतप्त तरुण पिढी आणि दलित साहित्य ही दोन जी वाङ्मयीन बंडे झाली तिची प्रखर अभिव्यक्ती मुख्यत: कवितेतून झाली. या संतप्त तरुणपिढीने लघु अनियतकालिकांची चळवळ केली. तिचा आरंभ शब्द या अनियतकालिकाने केला. अनियतकालिकांची ही चळवळ मुंबईत सुरु झाली व पुढे तालुकापातळीपर्यंत पोहोचली. आस्तित्ववादी जीवन संवेदना मराठी साहित्यात आणण्याचे काम या चळवळीने केले. सार्त्र, कामु, काफ्का ही साहित्यिक या कवींची दैवते बनली.
मनोहर ओक (आयत्या कविता) सतीश काळसेकर (इंद्रियोपविषद) वसंत गुर्जर (अरण्य) भालचंद्र नेमाडे (मेलडी) तुळशी परब (हिल्लोळ) अरुण कोलटकर (काळ्या कविता, अरुण कोलटकरची कविता) दिलीप चित्रे (कविता, कवितेनंतरच्या कविता), वसंत आबाजी डहाके (योगभ्रष्ट) गुरुनाथ धुरी (ग्लोरिया) हे कवी साठोत्तरी कवितेच्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. यापैकी दिलीप चित्रे, अरुण कोलटकर यांची कविता म्हणजे नवकवितेचे पुढचे वळण असे मानले जाते. या दोघांच्या कवितेची पाळंमुळं जुन्या मराठी कवितेपासून आधुनिक युरोपियन कवितेपर्यंत पसरली आहेत. मराठी कवितेचे आधुनिकीकरण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. विलास सारंग हे देखील एक महत्त्वाचे कवी. काव्यभाषा आणि आकृतिबंधाच्या दृष्टीने प्रयोगशील. १९६० पासुन मराठी कवितेवर अस्तित्ववादाची छाया पडलेली दिसते. निखळ अस्तित्वाचा अनुभव घेत जीवनाचे कोडे उलगडून दाखविण्याचा प्रयत्न या कवींचा आहे. माणसामाणसातील विसंवाद, कंटाळा, एकाकीपणा, अर्थशून्यता ही अस्तित्ववादी जाणिवेची वैशिष्ट्ये या कवींच्या काव्यलेखनात कमी अधिक प्रमाणात दिसतात.

दलित कविता :
साठोत्तरी दलित कवितेला स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्र्वभूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन साठोत्तरी दलित कवितेला स्फुरण चढले. दया पवार (कोंडवाड), यशवंत मनोहर (उत्थान गुंफा), वामन निंबाळकर (गावकुसा बाहेरील कविता), अर्जुन डांगळे (छावणी हलते आहे), नामदेव ढसाळ (गोलपिठा), हिरा बनसोडे (पूर्णिमा) इ. कवि या धारेतील महत्त्वाचे आहेत. १९६० नंतर दलित वर्गातील सर्वच जाती पुढे आल्या व कविता लिहू लागल्या. गंगाधर पानतावणे यांच्या `अस्मितादर्शन' ने यांना वाङ्मयीन व्यासपीठ मिळवून दिले. दलित कवितेच्या रुपाने एक नवी सामाजिक संवेदनशीलता मराठी काव्यात आली.
नारायण सुर्वे :
मुंबई सारख्या महानगरातून कामगार वस्तीतून पुढे आलेला एक समर्थ कवी. कामगार आहे मी तळपती तलवार आहे... सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे असे म्हणत मजुरवर्गाची कैफियत त्यांनी मांडली. ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा हे तीन महत्त्वाचे कवितासंग्रह. त्यांच्या कवितेला क्रांतीचे सुजाण भान आहे. सुबोधता हे तिचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सर्व थरातील रसिकांशी ते संवाद साधते. सुर्वे यांनी `गाणी चळवळीची' हा स्फूर्तिदायक कवितांच्या संग्रहाचे संकलन व संपादन केले आहे. याशिवाय आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, आनंद यादव, पुरुषोत्तम पाटील, शंकर वैद्य, शंकर रामाणी हे कवी देखील साठोत्तरी कवितेत महत्त्वाचे आहेत. सुरेश भटांनी भावगीते आणि गझल या रुपात मराठी कविता लिहिली. कुठल्याही इझम शी बांधिलकी नसणं हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. ग्रेस यांच्या कवितेत लोकजीवनातून, भारतीय सांस्कृतिक संचितातून साकार झालेली प्रतिभासृष्टी दिसते. चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग, संध्याकाळच्या कविता, हे त्यांचे महत्त्वाचे कवितासंग्रह.
आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर) हे साठोत्तरी कवितेतील एक महत्त्वाचे कवी. गंगाधर गाडगीळ यांनी त्यांचे वर्णन काव्यात न मावणारा कवी असे केले आहे. कालातीतता, संदर्भसंपृक्तता, अनेकार्थता हे श्रेष्ठ साहित्याचे गुण त्यांच्या काव्यामध्ये आहेत. रॉय किणीकरांचे रात्र आणि उत्तररात्र हे देखील कवितासंग्रह महत्त्वाचे मानले जातात.
पु. शि. रेगे -
काव्यातील भाव आणि शृंगाराच्या मोकळ्या उत्तान छटा हे रेगेंच्या कवितेचे वैशिष्ट्य. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना शारीरिक शृंगार यांचे वर्णन रेगे धीटपणे करतात. दोला, फुलोरा, हिमसेक, गंधरेखा, हसरापक्षी, श्रियाळ हे त्यांचे महत्त्वाचे कवितासंग्रह. स्त्रीचे कामुकवर्णन त्यांच्या कवितेत असले तरी ते कलात्मक परिणाम साधत होते. शब्दांच्या सुक्ष्म अर्थछटा, भावछटा, शब्दांचे उलट सुलट क्रम, शब्दांमधील विराम, अवकाश यांचा अतिशय कलात्मक रीतीने ते वापर करतात.
विं. दा. करंदीकर -
१९४९ मध्ये करंदीकरांचा स्वेदगंगा हा कवितासंग्रह आला. करंदीकर - बापट - पाडगावकर या त्रयींनी रंगमंचावरून काव्यवाचनाचे यशस्वी प्रयोग केले. कीर्तन, धोंड्या न्हावी माझ्या मना बन दगड, यंत्रावतार या त्यांच्या कविता लोकप्रिय झाल्या. मुक्तशैलीचा अवलंब आणि यंत्रयुगीन जाणिवांचा आविष्कार यामुळे त्यांच्या कवितेचे नवकाव्याशी नाते जोडता येते.
वसंत बापट -
प्रेम, देशभक्ती, सामाजिकता, निसर्गवर्णन हे बापटांचे कवितांचे विषय दिसतात. पोवाडा, लावणी, शाहिरी ढंग अशा विविध रचना त्यांनी केल्या. झेलमचे अश्रू, शतकानंतर, दख्खनची राणी या त्यांच्या कविता गाजल्या.
मंगेश पाडगावकर -
निसर्ग आणि प्रीती हे पाडगावकरांच्या कवितेचे प्रिय विषय. धारानृत्य, जिप्सी, छोरी हे त्यांचे कवितासंग्रह गाजले. कवितांच्या रचनांमधील ताजेपणा व अभिव्यक्ति मधील मोकळेपणा यामुळे त्यांना महत्त्वपुर्ण स्थान मिळाले.
याखेरीज सदानंद रेगे, शरचंद्र मुक्तिबोध, इंदिरा संत हे या काळातील काही महत्त्वाचे कवी - कवयित्री आहेत. 
नवकवितेच्या रुपाने दुर्बोधतेने मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. साठोत्तरी कवितेमध्ये ही दुर्बोधता अधिक प्रकर्षाने दिसते. आशय आणि आविष्कार या दोन्ही अंगाने ती दिसते. बोलीभाषा, विविध थरातील शब्दसामर्ध्य यांचा या कवींनी उपयोग करून घेतला आहे. वृत्त, छंद, अलंकार यांच्या ऐवजी मुक्तछंद आणि नवी प्रतिभासृष्टी या कालखंडातील कवितेत दिसते. 
सत्तर ते ऐंशीच्या दशकात अनेक कवी कविता लिहू लागले. गुरुनाथ सामंत, नारायण कुलकर्णी कवठेकर, उत्तम कोलगावकर, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, अनुराधा पाटील, अशोक बागवे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, राजस कल्याणकर, खलिल मोमीन, आसावरी काकडे, विवेक मोहन राजापुरे ही काही उल्लेखनीय नावे होत. 
१९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष व ७५ ते ८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दाक होते. स्त्रीवादी जाणिवा प्रभावी झाल्या. प्रभा गणोरकर, नीरजा, मल्लिका अमरोड, प्रज्ञा लोखंडे, रजनी परुळेकर, अश्विनी धोंगडे, हिरा बनसोड, अंजली कुलकर्णी यांच्या कवितांमधून या स्त्रीवादी जाणिवा प्रभावीपणे व्यक्त झाल्या. 
आज २००० सालच्या कालखंडामध्येही मराठी कवितेमध्ये नवे-नवे प्रवाह अंतर्भुत होत आहेत. तंतत्रविज्ञानाने झालेली क्रांती, त्यामुळे बदलून गेलेली जीवनशैली या नव्या कवींच्या कवितांमधून व्यक्त होते आहे. मंगेश, नारायण काळे, रमेश इंगळे, उत्रादकर, नितिन वाघ, सलील वाघ, संजीव खांडेकर, हमेंत दिवटे, गणेश विसपुते हे कवी समाजवास्तवावर मनुष्याच्या अस्तित्त्वावर काहीशी प्रतिक्रियात्मक स्वरूपाची कविता लिहीत आहेत.
मराठी कवितेचा हा १२५ वर्षांचा इतिहास पाहिला तर सुमारे १०० ते १२५ कवितांची संपादने आढळून येतात. संतांच्या रचनांपासून ते आधुनिक कालखंडात प्रत्येक टप्प्यावर मराठी कवितेने धारण केलेल्या रुपाची दखल यांमध्ये घेतली गेलेली आहे. ही घटना मराठी कवितेच्या विकासाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची मानायला हवीत.
भारतामध्ये विविध प्रांतांत लोकगीते, संत-सत्पुरुषांनी रचलेली गीते, मौखिक परंपरेतून आजपर्यंत टिकून राहिलेली गीते, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्तीपर कविता, स्वातंत्र्योत्तर कविता, आधुनिक कविता - असे अनेक प्रवाह कमी-अधिक प्रमाणात विकसित झालेले दिसतात. अधिकाधिक वास्तववादी कविता, सौंदर्यमूल्येही जपणारी कविता, कालानुरूप आधुनिक होत जाणारी कविता... आणि बदलत्या काळाची आव्हाने जाणणारे, पेलणारे व समाजाला पेलण्याची शक्ती देणारे समर्थ कवी... आदी सर्व वैशिष्टयांसह `मराठी कविता' आपला अद्वितीय ठसा उमटविते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा