शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

विष्णुदास भावे - मराठी रंगभूमीचे जनक


मराठी रंगभूमीचे जनक असणाऱ्या विष्णुदास भावे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे संपूर्ण नाव विष्‍णु अमृत भावे. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता. १८४२ मध्ये कर्नाटकातून 'भागवत' नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले.
त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर'नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार ` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले. सूत्रधाराकडून मंगलाचरणनंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषणविघ्‍नहर्त्या गजाननाचे स्‍तवन, सरस्‍वतीस्‍तवनगजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्‍णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत. नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला 'कचेरी' असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढेमहाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ' तागडथोम नाटके ' असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या 'अलल् डुर्र' अशा डरकाळीमुळे ' अलल् डुर्र ' नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.  
५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला.पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळकरीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्‍या त पडून राहिल्या होत्या व भावे यांच्याकठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे असून या कठपुतळ्या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येत. भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख नाट्याख्याने ' असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्यकवितासंग्रह (१८८५) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला.  विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८४३ साली मुंबईच्या दौर्‍यापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरु केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करुन १८५१ ते १८६२ सालापर्यत एकूण सात दौरे केले. १४-२-१८५३ साली झाला प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. या विष्णुदासांनी एकूण ५२ नाटके लिहिली. यांची सर्व नाटके पौराणिक होती. हा काळ धर्मप्रबाल्याचा असल्याने ते स्वाभाविक होते. नाटक मंडळीत पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णूदास भावे यांच्या पध्दतीची नाटकांची परंपरा १९१० सालापर्यत चालू ठेवली. ९ ऑगस्ट १९०१ साली नाट्याचार्य विष्णुदास अमृत भावे यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने भावे पुरस्कार ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनादिवशी देण्यात येतो.
संदर्भ : १. जोग, रा.श्री. संपा. मराठी वाङ्‍मयाचा इतिहास, खंड ४ था, पुणे, १९६५.
     २. बनहट्टी, श्री. ना. मराठी नाटककार आणि नाट्यवाङ्‍मय, पुणे, १९५९.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा