सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

हेचि दान देगा देवा...


गेल्या महिन्यात आषाढी एकादशी येऊन गेली. अनेकांनी एकमेकांना फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी वारकरी संप्रदायातील संत मंडळींचे विविध अभंग शेअर केले. मात्र या सर्वामध्ये माझ्या मनाला भावलं ते एक चित्र. भेगाळल्या भुईच्या पार्श्वभूमीवर कटेवर हात ठेऊन उभा असणारा पांडुरंग आणि आकाशात दाटून आलेले काळे मेघ. चित्र तयार करणाऱ्याने शेजारी ग्राफिटी टाकली होती. मात्र तीही अगदी सृजनशील हं. म्हणे,
कंबरेवरचा हात काढून आभाळाला लाव तू,
सोन्याचांदीचं दान नको भिजव माझा गाव तू..
खरंच महाराष्ट्रात या वर्षी पडलेल्या दुष्काळावर आणि लोकांच्या भाबड्या भक्तीवरचं हे भाष्य अतिशय बोलकं आहे. वाचताक्षणी आवडलेल्या या ओळींवर मग थोडा विचार केला. राज्यात दुष्काळ आहे, शेती नष्ट आणि गावं उद्ध्वस्त झाली आहेत हे सारं मान्य केलं तरी ही स्थिती काही पांडुरंगाने आणलेली नाही. ही परिस्थिती, हे संकट आपल्यामुळे, आपण निसर्गाच्या केलेल्या ऱ्हासमुळे ओढवलं आहे. आणि आपली जबाबदारी झटकून आपण थेट परमेश्वराकडे साकडं घालून मोकळं होतोय हे कितपत योग्य आहे? खरं तर हिच माणसाची प्रवृत्ती बनत चालली आहे. अधिकाधिक मिळवण्याच्या नादात आपण जीवनमूल्येच हरवून बसलो आहोत. भौतिक सुखांच्या मागे धावताना जगण्याचा अर्थच हरवून बसलो आहोत. आणि जेव्हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वाचा, सामर्थ्याचा अर्थ जाणवून देऊ लागलाय तेव्हा आपण ईश्वरी शक्तीकडे दाद मागू लागलोय. हे सर्वस्वी चुकीचं आहे. आपल्या चुका आपण जोवर सुधारत नाही, निसर्गाचं संगोपन करत नाही तोवर ही स्थिती कशी सुधारणार?
मनात या साऱ्या विचारांची वावटळ घुमत असताना काही दिवसांनी फेसबुकवर आणखी एक स्टेटस वाचलं, आणि त्या स्टेटसच्या अनामिक कर्त्याचं मी मनोमन अभिनंदन केलं. माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना जणू त्याने आपल्या लेखनाने वाचा फोडली होती. तो लिहितो,...
एक भक्त पांडुरंगाला विचारतो...
" कंबरेवरचा हात काढून आभाळाला लाव तू.. सोन्या चांदीच दान नको मला भिजव माझा गाव तू...”
त्यावर पांडुरंग हसून म्हणाला " भक्ता...
"आभाळाला हात लावून
पडेल कसा पाउस?
कुणी म्हणे काळ्या ढगावर क्लिक कर माउस!
आता म्हणतो नको मला सोन्याचांदीच दान,
झाड़ सगळी तोडून पृथ्वीवरची
सांग कोणी केली घाण?
आता म्हणतो पांडुरंगा पाउस फक्त पाड
प्रगतीच्या हव्यासापायी रान केल उजाड़....
भक्ता तुझी "फक्त घेण्याची" वृत्ती आता सोड,
चंगळवाद सोडून लाव निसर्गाची ओढ़!
हात जोडून मिटण्यापेक्षा उघड आता डोळे,
आई वसुंधरा रड़तेय बाळ काढ कानातले बोळे...
पृथ्वीच्या मुलाचं कर्तव्य आत्ताच पार पाड़..
जागा करून हरेक माणूस लाव फक्त झाड़..
पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट.
दिसला पाहिजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट..
आट्ठाविस युगांपासून विटेवर उभा राहून समतोलचाच संदेश देतोय..
पण भोळा भक्त माझा अर्थ न जानता फक्त प्रसादच घरी नेतोय..
खरंच किती यथार्थ लिहिलं आहे. आता आपणही जे जे वाईट त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा ते थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत नाही का? हेचि दान देगा देवा, निसर्गाचा विसर न व्हावा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा