बुधवार, ३० जुलै, २०१४

महानगरीय लेखकांसाठी सुगीचा काळ

ह्या पुढचा काळ हा शहरांचा असणार आहे, हे निविर्वाद सत्य. तेव्हा साहित्यातही खरं तर शहरी वातावरण वाढलेलं दिसायला हवं. पण मराठी साहित्यात मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नेमकं उलटं चित्र दिसतं आहे. जिल्हा-तालुका-गावांमधील लेखकांकडून साहित्याचं पीक जोमाने येत आहे आणि महानगरी लेखकांकडून अतिशय तुरळक! साहित्यात बदलत्या समाजजीवनाची दखल घेतली जाणं हे त्या भाषेतील साहित्य आणि समाजाची सुरळीत वाढ होण्यासाठी पोषक असतं हे जर गृहीत धरलं तर ही स्थिती फारशी आशादायक नाही. मराठी साहित्यात नजीकच्या भविष्यात ह्या विषयावर जबरदस्त घुसळण होण्याची गरज आहे. 

गेल्या २०-२५ वर्षांमध्ये ही जी नवीन वाटचाल सुरू आहे त्यामध्ये शहरं-महानगरं आणि गावं ह्या दोन्ही भूप्रदेशातील जनजीवनात मोठाच फरक पडला आहे. नागर भागांमध्ये आथिर्क उन्नतीच्या - पर्यायाने सुखवस्तू, उंची राहणीच्या- शक्यता अधिक असल्याने करिअर करून पैसे कमावण्याकडे जोरदार कल आहे आणि त्यासाठी सकारात्मक मानसिकता हा मूलमंत्र बनत चालला आहे. अर्थात जीवनाची व्यामिश्रता ध्यानात घेता हा तसा एककल्ली विचार आहे. त्यात समग्रता नाही, ज्यामुळे शहरी महानगरी मानसिकतेत प्रचंड अस्वस्थता जाणवते आहे. ती वाढत्या धामिर्कतेत, तथाकथित आध्यात्मिक गुरूंचे पेव फुटण्यामध्ये वगैरे दिसून येते आहे. हिंदी भाषेमध्ये अधिकाधिक संवाद चाललेल्या मुंबईसारख्या महानगरी वातावरणात आज पानाच्या गादीवर जा, चहाच्या टपरीवर जा, टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रेनमध्ये फिरा 'सुकून चला गया!' ही खंत सरसकट ऐकू येताना दिसते. एकीकडे उंची राहणीमानाची आस अमर्याद वाढते आहे तर दुसरीकडे त्यातील व्यर्थतादेखील मनात ठुसठुसते आहे. एकूण काय तर महानगरी जीवनातील घालमेल दिसामासाने वाढतेच आहे. 

मराठी साहित्याच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी ह्या दोन भूप्रदेशांचा विचार करताना मात्र असं दिसतं की, ग्रामीण-निमशहरी भाग हा शहराच्या तुलनेत जास्त सजग आणि सक्रीय आहे. ढोबळमानाने म्हणायचं तर, साठोत्तरी काळामध्ये शहरांमधील साहित्यनिमिर्तीचा ओघ झपाट्याने ओसरत चालला आहे. ह्याचं कारण ह्या काळात 'देशीवाद' ह्या संकल्पनेचा वरचष्मा प्रस्थापित झाल्यापासून मुंबईसारख्या शहरातील लेखक न्यूनगंडाने पछाडले गेले आहेत. आपलं जगणं यांत्रिक आहे, खोटं आहे, ह्या मातीतील परंपरेपासून तुटलेलं आहे, तेव्हा आपण काहीही लिहिलं तरी ह्या पुढील काळात ते बाटगंच ठरणार असा काहीसा हताशपणा मुंबईकर लेखकांच्या मनात ह्या काळात तयार झाला. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांच्या काळात शहरी साहित्याला ओहोटी लागल्यासारखी झाली. 

ग्रामीण भागात नेमकी उलट स्थिती होती. आजवर आपल्या जगण्याला मराठी साहित्यात पुरेसं स्थान मिळत नव्हतं, ते ह्या नवीन 'देशीवादी' वातावरणात मिळण्यासाठी पुरेसा वाव आहे, हे ध्यानात आल्याने महाराष्ट्रभरच्या सर्वच ग्रामीण-निमशहरी वातावरणातील तरुण पिढी ह्या काळात जोराने लिहू लागली. विशेषत: कवितेसारखा आटोपशीर आकाराचा साहित्यप्रकार आणि कादंबरीसारखा ऐसपैस अवकाशाचा अघळपघळ साहित्यप्रकार ह्यामध्ये ह्या मंडळींनी एवढ्या जोमाने निमिर्ती केली की, त्यांनी ह्या दोन्ही प्रकारांचा रूढ ढाचाच बदलून टाकला. समाजमन कवेत घ्यायचा प्रयत्न करणे हा ह्या काळात साहित्यनिमिर्तीचा जणू मूलमंत्र ठरला आणि परंपरेला उजळा देऊन आपल्या संस्कृतीची पाळंमुळं तपासणे ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. 

ह्या काळात ग्रामीण-निमशहरी भागांमध्ये राहून लिहिणारी जी मंडळी आहेत ती आता साधारण ४५+ वयोगटातील आहेत आणि ह्या नवीन स्थित्यंतराच्या झपाट्यामुळे ती कमालीची अस्वस्थ होणं साहजिकच आहे. मात्र त्यांना आता आपल्या लिखाणाची दिशा बदलणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे ते नवीन वातावरण टिपण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये 'गेले ते दिन गेले' हा सुप्त सूर ऐकू येतो आहे, जो काळाच्या ओघात न केवळ शहरी तर त्यांच्याच भूप्रदेशातील तरुण पिढीलाही मानवणारा नाही. साहजिकच ह्या पिढीला लिहिण्यासाठी त्यांच्या राहत्या भूमीतील संचित फारसं कामाचं ठरणार नाही. उलट शहरी जाणीवेतून निपजलं जाणारं, नाविन्याची दखल घेणारं साहित्य हे त्यांच्यासाठी अधिक प्रेरणादायक ठरू शकेल आणि इथेच मराठी साहित्याच्या पुढील वाटचालीची मेख आहे! 

आजच्या नवीन पिढीला आपलंसं वाटेल अशा शहरी जाणीवेचं साहित्य मराठीमध्ये तूर्तास पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. गद्य साहित्याचा विचार करता भाऊ पाध्येंच्या नंतर त्यांच्या तोलामोलाचं लिहिणारा लेखक आज मुंबईमध्ये दिसत नाही. भाऊंना जाऊन आता सुमारे १५ वषेर् लोटली आणि त्याआधी सुमारे १० वर्षं विकलांगतेमुळे त्यांची लेखणी थंडावल्यासारखीच होती. म्हणजे सुमारे २५ वर्षांच्या काळात ह्या महानगरातून येथील रटरट सातत्याने टिपण्याचे प्रयत्न काही तुरळक कथाकार वगळता फारसे कुणी केलेच नाहीत. 

ह्याची कारणं थेट इंग्रजी माध्यमामुळे मराठीविषयीची वाढती अनास्था इथपासून शोधता येतील. पण त्याहीपेक्षा आपली निमिर्ती ही प्रचलित देशीवादी वातावरणात टिकणार नाही, ह्या जाणीवेतून आलेला न्यूनगंड हेच सर्वात मूलगामी कारण आहे. सुमारे ५० वर्षांपूवीर् देशीवादी धारणांमुळे गावांकडे झरझर धावलेला लंबक गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वातावरणामुळे हळूहळू पुन्हा शहरांकडे सरकू लागला आहे. बाकी शहर जेवढं मोठं तेवढ्या तेथील उलाढालीदेखील प्रचंड, हे वास्तव लक्षात घेता महानगरांमध्ये आशय-विषयाची नेहमीच रेलचेल असते. तेव्हा प्रश्न आहे तो फक्त काळाच्या पावलांची चाहूल घेऊन मरगळ झटकून लेखण्या पुन्हा सरसावण्याचा. ज्याच्या पाऊलखुणा आता फेसबुक, ब्लॉग्जसारख्या आधुनिक माध्यमांमधून जाणवत आहेत. परंपरेची फारशी तमा न बाळगता नवीन जीवनाला कवेत घेऊ पहाणारं साहित्य निर्माण होणे ही मराठी साहित्याची ताजी गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी ग्रामीण, निमशहरी, शहरी, महानगरी नवीन पिढी जाणीवदृष्ट्या जवळ सरकताना दिसते आहे ही मोठीच जमेची बाजू आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा