मंगळवार, २९ जुलै, २०१४

ओळख जपून ठेव...

आयुष्याच्या अवघड वाटेवर
जीवनाच्या अथक संघर्षात,
न जाणो केव्हा भेट होईल?
होईल की नाही?
आणि कधी झालीच तर
असेल का स्मृती मनात
एकमेकांना भेटल्याची?
कि पुन्हा नव्याने करून द्यावा लागेल परिचय?
कि अस्तित्वाच्या स्पर्धेत
स्वत्व हरवून बसल्यावर
नाहीच राहणार ओळखदेख?
नाहीच का उभं राहणार चलचित्र
असंख्य आठवणींचं
मनाच्या कालपटलावर?
कि उभी असेल एक खोल दरी
मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि यशापयशाची?
आणि हरवून गेलेली असतील
जवळची वाटणारी सारीच माणसे,
पण मग कधीतरी एखाद्या वळणावर
जाणवेल खूप एकाकीपण,
यशोशिखरावर एकट पडल्याची जाणीव दर्शवेल
आजुबाजूच भ्रामक निर्मनुष्य जग...
म्हणून या विचित्र जाणीवेच्या
भीतीपोटी तरी
ओळख जपून ठेव...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा