शुक्रवार, ६ मार्च, २०१५

महिकावतीची बखर - भाग १०

देवगिरीच्या लढाईचे सत्य ...

फारसी कागदपत्रे आणि काही मराठी संदर्भ यावरून शके १२१६ मध्ये (इ.स.१२९४) अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली आणि दख्खनेत मुसलमानी वरवंटा फिरवला असे वाचलेले बहुतेकांना ठावूक असते. पण अनेक ठिकाणी 'चार घटकेत रामदेवाचे राज्य अल्लाउद्दिनने घेतले' हा उल्लेख येतो तो चुकीचा आहे हे ह्या बखरीच्या संदर्भाने सांगावेसे वाटते. अल्लाउद्दिनने हल्ला करण्याआधी रामदेवरायाची स्थिती काही विशेष चांगली नव्हती. ठाणे-कोकणातील नागरशा सारख्या छोट्या राजाने देखील त्याचा पराभव केलेला होता हे आपण मागे पाहिले आहेच पण तरीही त्याने अल्लाउद्दिन विरुद्ध प्रखर लढा दिला होता. मुसलमानी आक्रमणाला तोंड देण्याची तयारी त्याने केली होती असेही दिसते.

रामदेवाने भुरदासप्रभू वानठेकर याच्याकडे सैन्याचे सर्व अधिकार दिले होते. तर भुरदासप्रभूचा पुत्र चित्रप्रभू याच्याकडे दुय्यम सेनाधिकार होता. सुमध नावाचा रामदेवाचा प्रधान होता. इतर अनेक मराठा संस्थानिक आणि ब्राह्मण मात्र रामदेवापासून फुटून फुटून निघाले होते. ह्याचे कारण त्यांच्यामधील वितुष्ट होते. ह्याच संधीचा फायदा घेऊन अल्लाउद्दिनने हे आक्रमण केले असावे का?

अल्लाउद्दिन खुद्द स्वतःच्या हसन आणि हुसेन २ मुलांसह देवगिरीवर वेढा घालून हल्ला चढवला असे बखर म्हणते. जेंव्हा खुद्द लढाई जुंपली तेंव्हा सुमधने तुंबळ युद्धात हसन यास यमसदनी धाडले. आपल्या भावाचा वध झालेला पाहताच हुसेन यादव सैन्यावर चाल करून आला. ह्यावेळी त्याला चित्रप्रभू सामोरा गेला. ह्या हल्यात चित्रप्रभूने हुसेन यास ठार केले. असे एका मागोमाग अल्लाउद्दिनचे दोन्ही पुत्र ठार झाले. तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली. आता खुद्द अल्लाउद्दिन त्वेषाने चालून आला आणि पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली. ह्यावेळी लढाईत भुरदासप्रभू धारातीर्थी पावन झाला. मुलांच्या मृत्यूने त्वेषात येऊन अल्लाउद्दिन जितक्या त्वेषाने चालून आला त्याहीपेक्षा अधिक त्वेषाने चित्रप्रभू आपल्या वडिलांच्या मृत्यूने अल्लाउद्दिन वर चालून गेला. पुन्हा एकदा यादव सेनेने म्लेच्छांच्या सैन्याला पराभूत करून पिटाळून लावले.

आता हे सर्व काही एका दिवसात झाले की काही दिवसात ते बखर स्पष्ट करत नाही. पण ह्यावरून यादव सेनेने पहिला विजय संपादन केला होता हे मात्र नक्कीच स्पष्ट होते.

आपल्या मुलांच्या मृत्यूने आणि पराभवाने क्रोधील अल्लाउद्दिन पुन्हा एकदा देवगिरीवर उलटून आला. ह्यावेळी त्याला रोखणे कोणालाच शक्य झाले नाही. चित्रप्रभू मारला गेला आणि अखेरीस म्लेच्छांचा जय झाला. महाराष्ट्रावर पाहिले मुसलमानी राज्य लादले गेले होते.


राजवाडे म्हणतात की, ह्या लढाईच्या वेळी रामदेवाबरोबर त्याचे संस्थानिक, मुत्सद्दी, सरदार आणि सामान्य लोक देखील सोबत नव्हते म्हणून तो हा पराभव थांबवू शकला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा