शनिवार, ३ जानेवारी, २०१५

प्रबोधनकार कवयित्री : सावित्रीबाई



महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक कवितेचीही परंपरा रुजवली‌. आज त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यप्रतिभेची करून दिलेली ओळख...

स्त्रीशिक्षणाचा पाया घालणा‍ऱ्या सावित्रीबाई फुले यांची काव्यसृष्टी अनेक प्रतिभांना हाक मारते आहे आणि या हाकेला ओ देऊन अनेक प्रतिभावंत मराठी साहित्यविश्वात उजेडाच्या वसाहती निर्माण करीत आहेत. सावित्रीबाईंचे साहित्य हे परत परत अभ्यासले जात आहे. त्यावर संशोधन होत आहे. समतेसाठी लेखणी झिजविणाऱ्या तमाम सृजनकर्त्यांना सावित्रीबाईंची कविता प्रेरणेचा विषय झाली आहे.

कवयित्री म्हणून सावित्रीबाईंच्या काव्यसृष्टीचा शोध अन् वेध घेताना त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश अनेक ठिकाणी आपल्याला दीपवून टाकतो. खरे पाहता ' कविता ' हे काही त्यांचे जीवितकार्य नाही. अंधार पांघरुण युगानुयुगे झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्याच्या धडपडीत त्यांचे आयुष्य गेले. प्रचंड मोठा असा विरोधकांच्या प्रतिकूलतेचा पहाड चढण्यात त्यांची उमेद खर्ची झाली. त्यांनी जे काही लिहिले ते आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे. कविता लिहिण्यामागचा त्यांचा दृष्टिकोनही समाजप्रबोधन हाच होता. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या कविता आजही समर्पक वाटतात. हे त्यांच्या अनन्यसाधारण अशा प्रतिभेचेच लक्षण होय.

सावित्रीबाईंचे ' काव्यफुले ' आणि ' बावन्नकशी सुबोध रत्नाकर ' असे दोन कवितासंग्रह अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. पहिला काव्यसंग्रह ' काव्यफुले ' हा १८५४ साली , तर दुसरा काव्यसंग्रह हा १८८२ साली प्रसिद्ध झाला. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळले आहेत. त्यांच्या काव्यात प्रेम , करुणा , सामाजिक जाणीव आणि बंधुतेचे सूत्र आपल्याला आढळून येते. त्यांचे काव्य सत्याचा शोध घेऊन सत्याची कायमच पाठराखण करताना आपणास दिसते. सामाजिक जाणीवेच्या कवितेबरोबर , आत्मपर कविता , निसर्गविषयक कविता , स्वातंत्र्यविषयक कविता , प्रार्थनापर आणि बोधपर कविता अशा अनेक विषयांनी त्यांची काव्यसृष्टी बहरली आहे. अशा प्रकारच्या कविता त्यांच्या काळात दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने लिहिलेल्या नाहीत.

' काव्यफुले ' हा काव्यसंग्रह शिलाप्रेसवर छापलेला असून मुखपृष्ठावर शंकर-पार्वतीचे चित्र आहे. या काव्यसंग्रहाची छपाई मिशनरी छापखान्यात झाल्याचे नमूद आहे. या काव्यसंग्रहातील बारा कवितांचे सावित्रीबाईंनी मोडी लिपीत केलेले कच्चे टाचण उपलब्ध झालेले आहे , ही अभ्यासकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत.
काव्यफुलेहे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला फुलेहा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो. फुले हे त्याच्या घराणचे नाव वडिलोपार्जित फुलांचा व्यवसाय. सावित्रीचे भावविश्व फुलांनी बहरून गेले. पिवळा चाफा, जाईचे फुल, जाईची कळी, गुलाब फुलआदी त्यांच्या कवितांच शीर्षकावरून लक्षात येते. या संग्रहातील फुलाविषयीच्या कवितांचा आविष्कार अत्यंत आधुनिक आहे. आविष्कार पद्धती आधुनिक मराठी काव्यात फार पूर्वीपासून होती, व तिचा उगम सावित्रीबाईंच तारुण्सुलभ कवितेत आहे.

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे.
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने

या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतिकातून सावित्री अचूकपणे व समर्थपणे करते. या संग्रहातील उरलेल्या कवितांपैकी काही कविता तिच्या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. जोतिरावांच्या सम्यक विचारातून स्फुरलेल्या आहेत. स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हाया कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूम‍ी व नाटय़ अतिशय प्रभावी आहे.
काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी।
जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।

अशी जोतिरावांना ज्ञानसूर्यमानणारी महान कवयित्री अठराव्या शतकातील प्रेरक व प्रेरणादायी कवयित्री होती. 1811 साली जोतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी जोतिरावांचे एक पद्यमय चरित्र लिहिले आहे. त्याचे नाव बावन्नकशी सुबोध रत्नाकरहा काव्य चरित्रग्रंथ दस्तुरखुद्द सावित्रीनेच लिहिला आहे. फुले चरित्राबाबत तो अत्यंत विश्वसनीय दस्तऐवज मानला पाहिजे. या चरित्रग्रंथाला बावन्नकशी म्हटले आहे. त्यात बावन कडवी आहेत. लग्न झाले तेव्हापासून जोतिराव आपली पत्नी सावित्री आणि आऊसगुणाबाई यांनासुद्धा शिक्षणाचे पाठ देत असे हे चरित्र सांगते. म्हणूनच या चरित्रकाव्यग्रंथात कृतज्ञतेची भावना अभिव्यक्त झालेली आहे.
ज्योतिबा फुलेंचे कार्य आज अनेक प्रतिभांच्या उड्डाणाचे आकाश झाले आहे. ज्योतिबांचे कार्य अनेकांना ऊर्जा पुरवित आहे आणि हा ऊर्जेचा प्रवाह आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. सावित्रीबाईंनीदेखील आपल्या काव्यप्रतिभेने ज्योतिबांना पुढील शब्दांत वंदन केले आहे-

' ज्योतिबांना नमस्कार। मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई। ती आम्हाला उद्धरी... (ज्योतिबांना नमस्कार) '
' माझ्या जीवनात। जोतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला... (संसाराची वाट) '

पती म्हणून ज्योतिबांचे स्थान सावित्रीबाईंच्या जीवनात आहेच , पण त्याही पलीकडे एका कार्यरत आणि द्रष्ट्या ज्योतिबांचे चित्रण सावित्रीबाईंनी केले आहे. ज्योतिबा हे त्यांचे आदर्शस्थान आहेत , मार्गदर्शक आहेत. ज्योतिबांचा त्याग , त्यांची धडाडी आणि प्रज्ञा , त्यांची अमला करुणा , सामाजिक दायित्वाची त्यांची उत्कटता या साऱ्यांची तप्त खोल जाणीव सावित्रीबाईंना आहे. शूद्र-अतिशूद्रांच्या उत्थानासाठी आपले अवघे आयुष्य ज्योतिप्रमाणे जाळणाऱ्या या महामानवाचे महत्त्व समाजबांधवांना सांगताना सावित्रीमाई लिहितात-

' ज्योतिबांचे बोल। मनात परसा
जीवाचा आरसा। पाहते मी
सेवेच्या भावाने। सेवा जे करती
धन्यता पावती। मानवात ' ( ज्योतिबाचा बोध)

खरा प्रतिभवान कधीच रंजनवादी नसतो. आपल्या प्रतिभेचा उपयोग तो नेहमीच समाजहितासाठी करतो. सावित्रीबाईंनीही आपल्या काव्यप्रतिभेचा उपयोग बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केला आहे. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाच्या , शूद्रांच्या जीवनात बदल घडून येणार नाही , हे त्यांनाही उमगले होते. म्हणूनच पुढील शब्दांत त्यांनी अक्षरांचा श्रम केला आहे-
' शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा ' ( शूद्रांचे दुखणे)
' विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन ' ( श्रेष्ठ धन)
' उठा बंधूंनो अतिशूद्रांनो , जागे होऊन उठा
परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो , शिकण्यासाठी उठा ' ( शिकण्यासाठी जागे व्हा)

मनूने या देशात एक मानवद्रोही समाजव्यवस्था निर्माण केली. मनुवाद्यांनी ती प्रस्थापित आणि प्रतिष्ठित केली. शेकडो पिढ्यांची आयुष्ये या मनुवादी संस्कृतीने बरबाद केलेली आहेत. अमानुषतेचा , क्रौर्याचा एवढा कळस दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत आढळत नाही. मनुचे हे अपरंपरा क्रौर्य पाहून कवयित्री सावित्रीमाईंचे हृदय हेलावले आहे. मनुचा हा कपटी कावा लोकांना कळावा म्हणून त्या लिहितात-

' शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती।
जन्मी या फेडती शूद्र सारे
विषम रचती समाजाची रीती
धूर्ताची ही नीती। अमानव... ' ( मनू म्हणे)
' दोन हजार वर्षांचे। शूद्रा दुखणे लागले
ब्रह्मविहित सेवेचे। भू - देवांनी पछाडले
( शूद्राचे दुखणे) '

सामाजिक कवितेबरोबरच या कवितासंग्रहात काही हळुवार अशा कविताही आहेत. अवतीभवतीच्या निसर्गनोंदी सावित्रीमाईंच्या कवीमनाने नजाकततेने चित्रीत केल्या आहेत. त्यांची निसर्गाविषयी असलेली स्वाभाविक ओढ , सूक्ष्म निरीक्षणदृष्टी यातून प्रतीत होते. त्यांच्या ' पिवळा चाफा ', ' जाईचे फूल ', ' फुलपाखरू ' या कविता उल्लेखनीय आहेत. अत्यंत तरल अशा शब्दकळेतून या कविता रसिकांपुढे येतात.

' पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदयी बसतो
( पिवळा चाफा) '
' फुल जाई
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
( जाईचे फूल) '


१८८२ साली जोतिराव फुल्यांच्या मृत्यूनंतर ' बावन्नकशी सुबोध रत्नाकर ' हा सावित्रीमाईंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. हा काव्यसंग्रह म्हणजे जोतिराव फुले यांचे अधिकृत असे पहिलेच काव्यमय चरित्र होय. या काव्यसंग्रहामध्ये ५२ कडवी आहेत. कदाचित म्हणूनच बावन्नकशी असे नाव दिलेले असावे. या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी प्राचीन मध्यमयुगीन कालखंडाचा इतिहास सांगितला आहे. तसेच पेशवाईने केलेले अत्याचार चित्रीत केले आहेत.

' पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते ' ( पेशवाई)

उपेक्षितांच्या जागरणाचा वसा घेऊन सावित्रीमाईंनी केलेली काव्यरचना पाहून आपले मन भरून येते. त्यांचे काव्य म्हणजे मराठी भाषेतील क्रांत‌िकाव्यच होय. कारण असे काव्य त्या काळात अन्य कोणत्याही स्त्रीने लिहिलेले नाही. लोकशिक्षणासाठी कवितांचा एक माध्यम म्हणून त्यांनी उपयोग केला आणि मराठी साहित्यात एक अक्षरवाङ्मयाची भर पडली. त्यांच्या या कविता अनेक पिढ्यांच्या प्रतिभेला प्रबोधनाची प्रेरणा देत राहील , यात शंका नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा