मला भावलेले... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मला भावलेले... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ मे, २०१६

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले




पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!
सुरेश भट

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

दंगा




तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट

रिक्त




उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


सुरेश भट

उशीर



हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!

केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!

आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!

होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!

झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


सुरेश भट

पाहिले वळून मला




कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला

तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला

पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?
उगीच लोक खुळे पाहती जळून मला

खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला

उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?
करी अजून खुणा चंद्र मावळून मला

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

सुरेश भट

वणवण




रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो!

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो!

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज न ताराच तो गवसला नेमका..
अंबरापार मी वणवणत राहिलो!
सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!




मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
 
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
सुरेश भट

सोमवार, १४ मार्च, २०१६

ओठ


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?
आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?
बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?
(एल्गार)
सुरेश भट

बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

(एल्गार)
सुरेश भट

जगत मी आलो असा


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
(रंग माझा वेगळा  ह्या काव्यसंग्रहातून)
सुरेश भट

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

(एल्गार)
सुरेश भट

ऊन हिवाळयांतील शिरशिरतां


ऊन हिवाळयांतील शिरशिरतां
स्थितप्रज्ञ काळया दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.
ऊन हिवाळयांतील हळदीचें
किरीट घालतें वृध्द वडावर!
मला वाटतें तळयांत पाहुन
हात फिरवतो तो दाढीवर !
ऊन हिवाळयातील कुडकुडतें,
कुशींत शिरतें दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झ-याचा फुटतो पाझर.
ऊन हिवाळयांतील भुळभुळतें
आजीच्या उघडया पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमतें आपण
पुन्हा जरीचा ल्यालों परकर!
ऊन हिवाळयांतील हिरमुसतें
रुसतें, अन् माळावर बसतें;
मला वाटते त्यालाही पण
असेंच भलतें वाटत असते.

विंदा करंदीकर

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे


या स्वप्नांचे शिल्पकार
कवी थोडे; कवडे फार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा:
शिळा शोक, बुळा विनोद
भ्रष्ट कथा, नष्ट बोध;
नऊ धागे, एक रंग;
व्यभिचाराचे सारे ढंग!
पुन्हा पुन्हा तेच भोग;
आसक्तीचा तोच रोग.
तेच 'मंदिर', तीच 'मूर्ति';
तीच 'फुलें', तीच 'स्फूर्ती'
तेच ओठ, तेच डोळे;
तेच मुरके, तेच चाळे;
तोच 'पलंग', तीच 'नारी';
सतार नव्हे, एकतारी!
करीन म्हटले आत्महत्या;
रोमिओची आत्महत्या;
दधीचीची आत्महत्या!
आत्महत्याही तीच ती!
आत्माही तोच तो;
हत्याही तीच ती;
कारण जीवनही तेंच तें!
आणि मरणही तेंच तें!

विंदा करंदीकर

तेंच तें


सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!
माकडछाप दंतमंजन;
तोच चहा, तेच रंजन;
तीच गाणी, तेच तराणे;
तेच मूर्ख, तेच शहाणे;
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!
खानावळीही बदलून पाहिल्या;
(जीभ बदलणे शक्य नव्हते!)
'काकू'पासून 'ताजमहाल'
सगळीकडे सारखेच हाल.
नरम मसाला, गरम मसाला;
तोच तोच भाजीपाला;
तीच तीच खवट चटणी;
तेंच तेंच आंबट सार;
सूख थोडे; दुःख फार!

विंदा करंदीकर

बेडकांचे गाणे


डरांव् डुरुक् डरांव् डुरुक्,
डरांव् डुरुक्
आम्ही मोठे राव;
डरांव् डरांव् डरांव्!
सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा!
सागर नुसते नाव;
डरांव् डरांव् डरांव्!
गंगाजळ ना याहुन निर्मळ;
या डबक्यांहुन सर्व अमंगळ;
बेडुक तितुके साव;
डरांव् डरांव् डरांव्!
खोल असे ना याहुन काही;
अफाट दुसरे जगांत नाही;
हाच सुखाचा गाव;
डरांव् डरांव् डरांव्!
चिखल सभोंती अमुच्या सुंदर;
शेवाळ कसे दिसे मनोहर;
स्वर्ग न दुसरा राव;
डरांव् डरांव् डरांव्!
मंत्र आमुचा 'डरांव्'
आदी,'अनंत' आणिक असे 'अनादी',
अर्थ कसा तो लाव; डरांव् डरांव् डरांव्!

विंदा करंदीकर

समतेचे हे तुफान


उठलेऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचे हे तुफान उठले; उठले सागराकडे.
हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी;
शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे.
टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी -
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे.
स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही;
आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे.
दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना
कंकणनादा भिउनी तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे.
ऊठ खेडुता, पुन्हा एकदा झाडुनिया घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे.

विंदा करंदीकर

तीर्थाटण


तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी;
अन् तुझिया देहांत गवसली सखये मज तीर्थें सारी.
अधरावरती तव वृंदावन;प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानस सर.
मानेवरती गंगोत्री;
गया तुझ्या गालांत मिळाली;
रामेश्वर खांद्यावरती;
मिळे द्वारका कमरेपाशी अन् काशी अवतीभवती.
मोक्षाचीही नुरली इच्छा;
नको कृपा याहुन दुसरी;
तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी.

विंदा करंदीकर

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

असेच काही अवांतर १


इयत्ता सहावीत असताना पहिल्यांदाच इतिहासाच्या पुस्तकात कैलास मंदिराचं चित्र पाहिलं होतं. तेव्हापासून मनात वेरुळच्या लेण्या पाहण्याची इच्छा होती.आणि जेव्हा ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा मात्र आनंदापेक्षा अस्वस्थताच जास्त जाणवली. हजाराहून अधिक प्राचीन असलेल्या त्या लेण्यांतील तथागताच्या चेहऱ्यावर प्रेम, करुणा, शांती दिसलीच नाही मला. काहीशा चिंतेतच तथागत ओढीत होते हातातली जपमाळ. अन् स्तुपातला काळोख अधिकच गडद होत चालला होता. खोदलेले मोठे चौकोनी खांब अन् त्यावर अपुरी राहिलेली शिल्पे पाहताना नकळत त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मनात सुरु झाला. लेण्यांतला काळोख पडदा झाला. अन् त्यावर सुरु झाला भूतकाळाचा कल्पित चित्रपट. छिन्नी-हातोड्याचे नाजूक घाव घालत पाषाणातून आकार घेत गेलेली शिल्पे, विविध रूपे घेत जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्त्व, जातक कथा त्या एकसंध पाषाणातून चित्रित होत होत्या. बुद्धं शरणं गच्छामि म्हणत साधना करणारे भिक्षू, पिढ्यानपिढ्या खर्चून ते अप्रतिम शिल्प साकारणारे ते अज्ञात शिल्पकार कुठे अदृश्य झाले? काय झालं त्याचं? कठोर पाषाणाचे स्तंभ बनवून झाले होते. मग त्यावर शिल्प कोरण्याआधीच कुठे निघून गेले ते? काय कारण असावं? एखादा भूकंप झाला असेल का? की एखादा प्रलयंकारी पूर आला असेल? की धारेच हृदय आटवणारा एखादा दुष्काळ पडला असेल? पण एवढे शिल्पकार, एवढे भिक्षू सारेच कसे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत परागंदा होऊ शकतील? असं काही घडलंच असतं तरी आपत्ती सरल्यानंतर त्या शिल्पकरांनी परत येऊन आपलं अधुरं काम पूर्ण केलंच असतं ना? आपल्या पूर्वजांनी एवढ्या कष्टाने, आस्थेने आणि समर्पित वृत्तीने निर्मिलेल्या या कलाकृतींना का बरं असं अपूर्ण ठेवलं गेलं? की काळानेच अशी काही कोलांटी घेतली होती की हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही? असंख्य अनुत्तरीत प्रश्न मन विलक्षण सुन्न करून गेले. चिंतामग्न भासणारा तथागतांचा चेहरा आणखीनच करून वाटायला लागला. सभोवतालचा अंधार अधिकच गडद होऊ लागला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार साऱ्या भारतवर्षातच नव्हे तर श्रीलंका, कंबोडिया, जावा-सुमात्रा द्वीपसमूह, ब्रह्मदेश या नजीकच्या देशातही केला. कर्मकांडाचे, वर्णव्यवस्थेचे प्रस्थ मोडीत काढले. माणसाला माणसासारखे जगण्याचे बळ दिले. प्रेम, शांती, करुणेचा संदेश आणि बोधीसत्त्वाचे तत्त्वज्ञान भारताची ओळख बनले होते. अन् त्याचवेळी मौर्य राजवंशातील अखेरचा सम्राट राजा बृहद्रथ याची त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने याने वसंतोत्सवाच्या उत्सवात केलेली निर्घृण हत्या केली. त्यानंतर मगधच्या साम्राज्याचा ताबा घेत केलेला अश्वमेध, आणि त्याबरोबरच तथागतांच्या प्रेमाच्या, सहिष्णुतेच्या आणि करुणेच्या शिकवणुकीपुढे निष्प्रभ झालेल्या वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन यांसाठी केलेले बौद्ध भिक्षूंचे शिरकाण. सारंच मन हेलावून टाकणारं. कडे-कपाऱ्यांतून साधना करणाऱ्या बौद्ध भिक्षुंना शोधून त्यांची केलेली हत्या प्राचीन भारताच्या इतिहासातलं एक काळे-कुट्ट पर्व आहे. असंच काहीतरी घडलं नसेल ना? या वेरुळच्या अपूर्ण लेण्या, ते अज्ञात शिल्पकार आणि त्या अपूर्णतेमधलं अनाकलनीय गूढ. या साऱ्यांची उत्तरं इतिहासाच्या पुनर्रचनेतूनच शोधावी लागतील. आपल्या धर्माचे वर्चस्व वाढवण्यासाठी नेहमीच एका धर्माने दुसऱ्या धर्मावर हल्ला चढवत रक्तपात केल्याचे दाखले इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात पाहायला मिळतात. आणि याला कोणताच धर्म अपवाद नाही. खेदाची बाब म्हणजे मध्य आशियात माजलेले अराजक, चाललेली युद्धे, होणारा रक्तपात आणि प्रबळ होत जाणाऱ्या धर्मांध शक्ती हा सारा उलटा प्रवास आपण सुरु केला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची पुरेशी जाणीवही आपल्याला नाही. बदलत्या काळाची साद ऐकत विज्ञाननिष्ठेची कास धरून पुढे जाण्याऐवजी आपण जात, धर्म, वंश. प्रदेश यांच्या नावाखाली विभागले जातोय. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांचा उपमर्द करतोय. धर्मसुधारणेची गरज असताना धर्मांधतेला खतपाणी घालतोय. आणि हे सारं आपल्या पाषाण नेत्रांनी पाहणारे तथागत म्हणूनच कदाचित इतके उदास आहेत, चिंतामग्न आहेत. साऱ्या जगभरातून लोप पावलेली आपली प्रेम, दया, शांतीची शिकवण शोधू पाहताहेत तथागत. शेकडो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या नावावर झालेल्या हत्याकांडात बळी पडलेल्या लाखो निरपराधांचे रक्त वाहतंय तथागतांच्या डोळ्यातून अश्रू बनून, आणि आजही त्यांचा स्थितप्रज्ञ चेहरा देऊ पाहतोय सहिष्णुतेचा संदेश. आता गरज आहे फक्त तो संदेश समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची. 

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

नको नको रे पावसा


नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली;
नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?
नको करु झोंबाझोंबी
माझी नाजुक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऎक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा,कडाडून
मागे फिरव पंथस्थ;
आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी बोलेन;
पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;
नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्र्मौळी
आणि दारात सायली…..


इंदिरा संत