सोमवार, १ डिसेंबर, २०१४

वसंत



आणि वसंत परत येतोय
शाकुंतलाचं एक पान
माझ्या कपाटातून निघून
वाऱ्यावर तरंगत आहे
तरंगत आहे कि उठावं
आणि आजूबाजूला पसरलेल्या वस्तूंच्या कानात
सांगावं ‘नाही’
एक दृढ
आणि छोटंस नाही
जे साऱ्या आवाजांच्या विरुद्ध
माझ्या उरात सुरक्षित आहे.

मी उठतो
दारापर्यंत जातो
शहराकडे पाहतो
हलवतो हात
आणि जोरात ओरडतो
नाही नाही नाही
मी अस्वस्थ आहे
मी किती वर्ष गमावली
रुळावरून चालत
आणि जगाला म्हणत

हो, हो, हो...

सीमा सुरक्षा दल




सीमा सुरक्षा दल
स्थापना : १ डिसेंबर १९६५


सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवून सीमेचे शांतता काळात संरक्षण करण्यासाठी नेमलेले सैन्यदल. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण हे सैन्यदलाचे प्राथमिक कर्तव्य असले, तरी सदासर्वकाळ-विशेषतः शांतताकाळातही-सैन्य तैनात करणे, हे एकूण सैन्याच्या युद्घक्षमतेला हानीकारक आहे. काही अशांत व जागृत सीमांवर सैन्यदलांच्या तुकड्यांची उपस्थिती अपरिहार्य असली, तरी बाकीच्या सीमांवर सैनिकीसम दलाची ( पॅरामिलिटरी फोर्स ) योजना करणे, हे सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने इष्ट ठरते. या सैनिकीसम दलाचे किंवा पोलीस दलाचे प्रमुख काम हे सीमोल्लंघन आणि तस्करीविरोधी स्वरूपाचे असते. किंबहुना हे काम सैन्यदलांच्या कक्षेबाहेरील आहे. यासाठी १९४७ ते १९६५ दरम्यान भारताच्या धोकाविरहित सीमापट्ट्यांवर संबंधित राज्यांच्या जबाबदारीखाली राज्य सशस्त्र पोलिसांच्या (स्टेट आर्म‌्ड पोलीस) तुकड्या तैनात केल्या जात असत. जम्मू व काश्मीरमधील काही भाग वगळता बाकी सर्व सीमापट्टा या पोलीस दलाच्या अधिक्षेत्राखाली होता. पाकिस्तानने कच्छ विभागातील सरदार पोस्ट, छाड बेट आणि बेरिया बेट या गुजरात राज्यातील सशस्त्र पोलिसांच्या चौक्यांवर ९ एप्रिल १९६५ रोजी अचानक हल्ले चढवल्यानंतर मात्र हे सर्व बदलावे लागले. राज्य सशस्त्र पोलीस दल शत्रूच्या सैन्याकडून होणाऱ्या पद्घतशीर हल्ल्याचा प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले. त्यासाठी लागणारे युद्घसाहित्य, प्रशिक्षण आणि सैनिकी सामर्थ्य स्वाभाविकच सशस्त्र पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे शत्रूच्या हल्ल्यानंतर माघार घेण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य कोणताच पर्याय उरला नव्हता.

या बाबतीत सर्व दृष्टींनी विचारविमर्ष झाल्यावर पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एका विशेष, केंद्रनियंत्रित आणि शत्रूच्या हल्ल्याचा समर्थपणे प्रतिकार करु शकणाऱ्या पोलीस दलाची आवश्यकता असल्याची खात्री केंद्र शासनाला पटली आणि सीमा सुरक्षा दल या विशेष पोलीस दलाची रचना करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार १ डिसेंबर १९६५ रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली. भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी के. एफ्. रुस्तमजी यांची पहिले दलप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या दलाचे कार्य चालते.


भारताच्या सीमांची सुरक्षितता आणि त्याच्याशी निगडित असलेले विषय ही सीमा सुरक्षा दलाची प्राथमिक भूमिका होय. सीमा सुरक्षा दलाचे काम शांतताकाळ आणि युद्घकाळ या दोन्हींत सातत्याने चालू असणे आवश्यक असल्याने या दोन वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या कामांची जंत्री अशी :

शांतताकाळात : सीमा प्रदेशात राहणाऱ्या जनतेत सुरक्षिततेच्या भावनेची जोपासना करणे; सीमापार गुन्हे आणि अवैध प्रवेश-निर्गमनावर प्रतिबंध लादणे आणि चोरीची आयात-निर्यात आणि इतर अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवणे.


युद्घकाळात :  दुय्यम धोक्याच्या क्षेत्रांमध्ये शत्रूच्या हल्ल्याविरुद्घ संरक्षणफळी उभी करून महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे. तसेच विस्थापितांचे नियंत्रण-पुनर्वसन करून निर्देशित क्षेत्रात घुसखोरीविरुद्घ कारवाई करणे.

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापनेपासून आजतागायत हे दल राष्ट्रसेवेसाठी झटत आहे. भारत-पाक यांच्यामधील १९७१ चे बांगला देश युद्घ आणि १९९९ चे कारगिल युद्घ या दोन्हींमधील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून सीमासंरक्षण करणाऱ्या या दलाचे कार्य सुकर आणि परिणामकारक होण्यासाठी भारतपाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा आणि जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लोखंडाचे अभेद्य कुंपण बांधून रात्री दोन्ही बाजूंचे क्षेत्र स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरांचे प्रमाण कमी होऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या कामास मदत मिळाली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्षेत्रास वेगवेगळे नवे पैलू प्राप्त झाले आहेत. या दलाच्या तुकड्या संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता प्रस्थापनेसाठी कोसोव्हो आणि बोस्नियामध्ये पाठवल्या गेल्या. केवळ पाकिस्तान सीमेपर्यंतच मर्यादित न राहता सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या उपद्रववादी विरोधी कार्यवाहीसाठी मणिपूर राज्यातही तैनात आहेत. गुजरातमधील जानेवारी २००१ मधील भूकंप आणि इतर जातीय दंगलींदरम्यान सीमा सुरक्षा दलाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. या दलाच्या उपलब्धींचा धावता आढावा घ्यायचा म्हटल्यास १९९० ते २००८ या एकोणीस वर्षांच्या कार्यकाळात दलाने ४,८११ दहशतवादी ठार केले, ११,७८७ घुसखोर पकडले, १५,७५६ शस्त्रे जप्त केली, ,९२३ कोटी रुपये मूल्यांची चोरटी आयात-निर्यात पकडली आणि १३,६५४ किग्रॅ. स्फोटके जप्त केली. या कालखंडात सुरक्षा दलांच्या १,३७३ जवानांनी प्राणाहुती दिली, तर ५,६६५ जवान जखमी झाले. ही आकडेवारी सीमा सुरक्षा दलाच्या सर्वोच्च राष्ट्रसेवेची द्योतक होय.

सीमा सुरक्षा दलाला १ महावीरचक्र, ४ कीर्तिचक्रे, ११ वीरचक्रे, १० शौर्यचक्रे आणि ५६ सेनापदके या वीरसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक सन्मान त्याच्या अधिकारी आणि जवानांना व्यक्तिगत पातळीवर प्राप्त झाले आहेत.


राष्ट्रसेवेसाठी वाहून घेतलेल्या सीमा सुरक्षा दलाचे हे धवल राष्ट्रकार्य भविष्यातही चालू राहील यात तीळभर संदेह नाही.

हरवलेल्या वाटा
शोधता न आल्या
अशा जुन्या स्मृती

पुन्हा जाग्या झाल्या

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

मी गंगेला पाहिलं



मी गंगेला पाहिलं
एका दीर्घ प्रवासानंतर
जेव्हा माझे डोळे
काहीही पाहण्यासाठी आतुर होते
जेव्हा माझ्याकडे काहीही काम नव्हतं
मी गंगेला पाहिलं
उष्माघाताच्या प्रचंड प्रहरानंतर
जेव्हा एका संध्याकाळी
मला उभारी आणि तजेल्याची
आत्यंतिक गरज होती
मी गंगेला पाहिलं, एक रोहू मासा होता
डबडबलेल्या डोळ्यांत
जिथे जीवनाची अपार लालसा होती
मी गंगेला पाहिलं जिथे एक म्हातारा नावाडी
वाळूत उभा होता
घरी जाण्याच्या तयारीत
आणि मी पाहिलं –
म्हातारा खुश होता
वर्षाच्या त्या सर्वात उदास दिवसातही
मला नवल वाटलं हे पाहून
कि गंगेच्या पाण्यात किती लांब
आणि अप्रतिम वाटतं
एका म्हाताऱ्या माणसाच्या खुश असण्याचं प्रतिबिंब...

आता म्हातारा जरा चुळबुळला
त्याने आपलं जाळ उचललं
खांद्यावर ठेवलं
एकवार पुन्हा गंगेकडे पाहिलं
आणि हसला
हे एका वृद्ध नावाड्याचे हास्य होते
ज्यात कोणताच पश्चात्ताप नव्हता
जर होती तर ती एक प्रामाणिक
आणि मनःपूर्वक कृतज्ञता
वाहणाऱ्या चंचल पाण्याप्रती
जणूकाही त्याचे डोळे म्हणत आहेत –
“आता झाली आहे सांज
गंगामाई
राम राम...”



रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई



गोविंद सखाराम सरदेसाई,
(१७ मे १८६५-२९ नोव्हेंबर १९५९)


महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी इतिहासकार. त्यांचा जन्म सखाराम व गंगाबाई या दांपत्यापोटी गरीब शेतकरी कुटुंबात गोविल (रत्नागिरी जिल्हा) या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण शिपोशीत झाले. मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगूताई कीर्तने या मुलीशी ते विवाहबद्ध झाले (१८८४). पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले (१८८८) आणि बडोद्यास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून महिना सत्तर रुपयांवर नोकरीस लागले (१८८९). सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचाविशेषतः यूरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणूनही काम दिले होते. साठाव्या वर्षी निवृत्तीवेतन घेऊन ते संस्थानी सेवेतून निवृत्त झाले (१९२५). सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्यात कष्टाळूपणा आणि काटेकोरपणा आला. निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले. उर्वरित जीवन त्यांनी इतिहासलेखन-वाचन आणि संकलन यांत व्यतीत केले. त्यांच्या इतिहासलेखनास बडोद्यात असतानाच प्रारंभ झाला होता.

सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली (१८९८). याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स व प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवादकेले.या नंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले आणि इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला.त्याचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालकमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले. मराठी रियासत व ब्रिटिश रियासत या दोन रियासतींच्या खंडांच्या आवृत्त्या १९३५ पर्यंत निघाल्या. त्यानंतर स. मा. गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली पॉप्युलर प्रकाशनाने आठ खंडांत मराठी रियासती ची नवी आवृत्ती प्रकाशित केली (१९८८-१९९२). यात विविध इतिहासकारांनी नव्याने उजेडात आलेल्या साधनांचाही चपखल उपयोग केला आहे. रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक व बालोपयोगी भारतवर्षमहाराष्ट्राचा इतिहासइतिहासाच्या सोप्या गोष्टीहिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्यात मैत्री होतीती प्रदीर्घकाळ टिकली. जदुनाथांनी ‘सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार’ असे सरदेसाईंना गौरवाने म्हटले आहे. छ. शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सूव्हेनिअर (१९२७) या ग्रंथाचे संपादन केले. त्यांमुळे परप्रांतात त्यांची कीर्ती पसरली. गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले. ब्रिटिश शासनाने १९२९ मध्ये त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यांना कृ. पां. कुलकर्णीय. न. केळकरवि. गो. दिघे यांसारखे अभ्यासू सहकारी लाभले. त्यामुळे पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे ४५ खंड प्रसिद्ध झाले (१९३०-३४). त्यांनी श्यामकांत या थोरल्या मुलाने शांतिनिकेतन व जर्मनी येथून वेळोवेळी पाठविलेली पत्रे श्यामकांतची पत्रे या शीर्षकाने प्रसिद्ध केली (1934). सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्ताररत्नाकरमनोरंजनचित्रमयजगतसह्याद्रीलोकशिक्षण इ. नियतकालिकांतून सु. २७५ लेख लिहिले. लोकशिक्षणाच्या डिसेंबर १९३२ च्या अंकात त्यांनी ‘राष्ट्रीय इतिहास : अर्थव्याप्ती आणि भूमिका’ या शीर्षकाचा लेख लिहून इतिहासशास्त्राचा अभ्यासत्याचा उपयोग व दुरुपयोगधर्म व राजकारणइतिहास साधने व साध्यनवीन संशोधनसंशोधक वगैरे मुद्यांची मीमांसा केली आहे आणि अखेरीस राजकारणात धर्म आणू नये व हिंदु-मुस्लिमांच्या ऐक्यावर भर द्यावाअसा उपदेश केला आहे. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर (१९४३) ते एकाकी झालेतथापि इतिहासलेखनाचे वत अखंडपणे त्यांनी चालू ठेवले आणि इंगजीत न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज ( तीन खंड१९४९) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. याशिवाय त्यांनी मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी व पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स (पाच खंड) हे ग्रंथ डॉ. जदुनाथ सरकार यांच्या संपादन-सहकार्याने इंगजीत प्रसिद्ध केले. त्यांनी काव्येतिहाससंग्रहा तील पत्रेयाद्या आणि भारतवर्ष व इतिहास संगह या नियतकालिकांतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे संपादनही केले आहे. शिवाय परमानंदाच्या अनुपुराणा चे संपादन करुन ‘गायकवाड ओरिएंटल सेरीजमध्ये ते प्रसिद्ध केले.

सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब (१९३३) व नंतर रावबहादूर हा किताब दिला (१९३८). ते मराठी साहित्य संमेलनाच्या १९३८ च्या निवडणुकीत स्वा. सावरकरांविरुद्ध अपयशी ठरलेपण अहमदनगरचे अध्यक्षपद त्यांनी नाकारले (१९४३). राजवाडे संशोधन मंदिराने (धुळे) ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला (१९४६). पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली (१९५१). त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले (१९५६). भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला (१९५७). वृद्घापकाळाने त्यांचे कामशेत येथे निधन झाले.

सरदेसाई यांनी उपलब्ध साधनांवरुन मराठ्यांचा इंगजी व मराठी भाषांत संपूर्ण सुसंगत समग्र इतिहास लिहिण्याचे काम केले. त्यांनी संशोधन असे फारसे केले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर संकलनकार अशी टीका होते. त्यांच्या रियासतीत काही दोषउणिवा किंवा तपशिलांच्या चुका चिकित्सक अभ्यासकाला आढळतात. तथापि त्यांनी संकलनाच्या आणि विवेचनाच्या ज्या दिशा दाखविल्या आहेतत्यामुळे त्यांचे कार्य एक भक्कम पाया म्हणून नेहमीच महत्त्वाचे व चिरस्मरणीय राहील. म्हणूनच समाजाकडून रियासतकार ही सार्थ उपाधी त्यांना लाभली.

संदर्भ :
१. गर्गेस. मा. संपा. मराठी रियासतखंड १मुंबई१९८८.
२. टिकेकरश्री. रा. जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाईमुंबई१९६१.
३. ताटकेअरविंदसंशोधक सप्तर्षिपुणे१९६२.
४. देशपांडेसु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकारपुणे१९९४.

प्रतिप्रश्न




शाळेत एके दिवशी
मी बाईंकडे गेले.

“बाई, मला भाषण करायचंय.
मला स्पर्धेत भाग घ्यायचाय.”

बाई म्हणाल्या,
“तुला जमणार नाही.”

“का?” मी विचारलं

“तुमच्यात केलंय का कधी कुणी भाषण?”

बाई एवढंच म्हणाल्या
मी प्रतिप्रश्नही केला नाही.



प्रश्न




शाळेच्या पहिल्याच दिवशी

घरी परतताना आईने केली चौकशी

नव्या मैत्रिणींची

त्यांच्या आडनावासहित

आणि मग तिनेच ठरवलं

मी कुणाशी मैत्री करावी...

आपला डबा कुणासोबत खावा

हे सांगतानाच

ती शिकवत गेली अनाहूतपणे

कुणाच्या डब्यातलं खाऊ नये.

मी कधी कारण विचारलं नाही.

तिने विचारल्याशिवाय सांगितलं नाही.

इयत्तामागून इयत्ता वाढत गेल्या 

आणि कळत गेलं

आपण शाळेत शिकण्यासाठी जातो

फक्त तेवढंच जेवढं पुस्तकात आहे

कोणताही अभ्यासेतर उपक्रम

आपल्यासाठी नाही.

त्यासाठी वेगळे विद्यार्थी आहेत.

मग मात्र मी कारण विचारलं आईला,

“जी संधी त्यांना मिळते ती मला का नाही?"

आणि यावेळी मात्र
आई निरूत्तर....