बुधवार, १५ जुलै, २०१५

गवतफुला- इंदिरा संत



रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्राला;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे

पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.

वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.

गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.

तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.

मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे

आज इंदिरा संताचा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांची कविता

बुधवार, १ जुलै, २०१५

पदर !





"पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार पदर

शुक्रवार, १२ जून, २०१५

एकतरी वारी अनुभवावी

वारी- काय आहे जाणून घ्या

१) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली... काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच!

२) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.

३) अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्या मागे केवळ परंपराच नाही तर एक श्रदधाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रदधा असते.

४) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.

५) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.

६) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.

७) इ.स.१८३१ पासून ह्या वारी सोहोल्यास श्रीमंत शितोळे सरकार यांचा राजाश्रय आहे. आजही तो अखंडपणे चालूच आहे. त्यांच्या ह्या सेवेचे स्मरण आणि बूज म्हणून आजही श्री माऊलीचा रात्रीतळाचा मुक्काम श्रीमंत शितोळे सरकारांच्या तंबूतच असतो.

८) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.

९) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
१०) संपूर्ण वारी सोहळ्यात मानाच्या कीर्तनाव्यतिरिक्त इतर कुठलेही कीर्तन होत नाही. ह्या कीर्तन सेवा श्री हैबतबाबांपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही त्यांचे वंशज अतिशय श्रद्धेने त्या पार पाडत आहेत.

११) वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत १) उभे, २) गोल. वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात.

या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो.

१२) वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात.

१३) सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो.

१४) दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.

१५) वारीसाठीची पूर्वतयारी संस्थान समिती, मालक, चोपदार हे चैत्र महिन्यापासूनच सुरू करतात. वारीच्या मार्गातील सर्व तहसील, ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करतात व योग्य उपाययोजना सुचवितात.

१६) वारीत लाखोंचा जनसमुदाय एकत्रित चालतो पण त्यात कधीच कुठेही भांडणतंटा होत नाही. विशेष काही तक्रार असल्यास रात्रीच्या मुक्कामासाठीच्या तळावर त्याबाबत निर्णय घेतला जातो.

१७) वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. दिंडीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याची त्यात अंतर्गत भिशी (कॉन्ट्रिब्यूशन) असते. सर्व खर्च या निधीतून केले जातात. काही दानशूर दिंडीला या ना त्या स्वरूपात दानही देतात.

१८) रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालणे सुरू करतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावरच या दिंड्या विसावतात (बसतात). विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही जोवर माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत.

१९) काही वारकरी वारीत फक्त पाणीवाटपाची सेवा देतात. वारी सुरू होऊन संपेपर्यंत त्यांचे काम पाणी वाटपाचेच असते. २०) काही वारकरी संपूर्ण वारीत अनवाणी चालतात, तर काही वारीत एकच वेळ जेवण करून चालतात.

२१) वारी सोहळ्यातील काही दिंड्या ह्या लोकशाही पद्धतीने चालविल्या जातात. श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फड (रथामागे ७ क्रमांकाची दिंडी) हे या पद्धतीचे उदाहरण. फक्त वारीपुरतेच नाही तर वर्षभर ह्या दिंड्यांचे हरीभक्तीचे कार्यक्रम आपापल्या गावी सुरू असतात.

२२) संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात.

२३) श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.

२४) वेळापूर येथे भारुडाचा मान हा शेडगे दिंडीकर्यांना आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या तत्कालीन बहुजनसमाजाला आध्यात्मिक ज्ञानदान करण्याचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून आपल्यासमोर साकारतो.

२५) श्री ज्ञानोबारायांना अखिल मानवजात ‘माऊली’ असेच म्हणते. लेकराचे हित चिंतते ती माऊली! विश्वातल्या यच्चयावत जीवांना त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदानामध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात म्हणून ज्ञानोबाराय हे ‘माऊली’ आहेत. आमच्या नामदेवरायांनी तर ज्ञानोबारायांना ‘योग्यांची माऊली’ म्हणून गौरविले. नाथरायांनी ‘साधकांचा मायबाप’ असा ज्ञानोबारायांचा महिमा गायला. श्री ज्ञानेश्वर महाराजांना आपण ‘ज्ञानोबा’ असे मोठ्या प्रेमादराने संबोधतो. ‘बा’ हे आदरार्थी वचन आहे. ज्ञानोबारायांच्या ठायी असणारे साधकाचे मातृत्व ‘माऊली’ या संबोधनाने तर साधकाचे पितृत्त्व ‘बा’ या शब्दाने सूचीत होते.

जगी ऐसा बाप व्हावा| ज्याचा वंश मुक्तीस जावा॥पोटा येतां हरले पापा| ज्ञानदेवा मायबापा॥असे तुकोबाराय म्हणतात.

२६) श्रींचे वारी सोहळ्यात होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत..

शुक्रवार, २२ मे, २०१५

श्री कनकादित्य मंदिर कशेळी

          कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरी पासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे. आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर आहेत.

          रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे. कशेळी गावात श्री कनकादित्य मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता त्याच्या जहाजामध्ये हि आदित्याची मूर्ती होती जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावाड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले.

          कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकर्यांनी समुद्रावर जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकर्यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.
          रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत. कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.

         पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती. दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणार्या या उत्सवाच्या काळात कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो कालिकादेवीबरोबर आडिवर्याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते. उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.

कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35किमी)

गुरुवार, २१ मे, २०१५

आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर


कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असेलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापुर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ  म्हणून प्रसिद्ध होत आहे.
आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची
स्थापना केली.

मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शनघेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात. दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा या जागृत देवस्थानाला व नितांत सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या.

कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर -
रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे ( २८ किमी)

साने गुरुजी

जन्म : २४ डिसेंबर १८९९
मृत्यू : ११ जून १९५०

        
           पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई ’ या पुस्तकातून केले आहे. ‘ खरा धर्म आणि बलसागर भारत होवो ’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते.

          १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

रविवार, १७ मे, २०१५

भारताच्या मान्सूनवर एल निनोचे सावट

         पाणीटंचाईने पोळलेल्या आणि कडक उन्हाने होरपळलेल्या साऱ्यांनाच मान्सून वेळेआधीच दाखल होणार या बातमीने दिलासा दिला होता मात्र यंदाच्या मान्सूनवर लटकणारी एल निनोची तलवार कायम असून वेळेआधी येणारा मान्सून समाधानकारक बरसणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. 

         भारताच्या हवामानशास्त्र विभागाने मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल होत असल्याचे जाहीर केले असले तरी एल निनो प्रवाहांचा धोकाही वर्तवला आहे. एल निनो हे प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह असून महासागराच्या पृष्ठभागाखालील तापमानाच्या वाढीमुळे त्यांची निर्मिती होत असते. या एल निनो प्रवाहांचा प्रभाव भारतातील मान्सूनवर प्रामुख्याने जाणवतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एल निनो सध्या विकासात्मक प्रक्रियेत असून येत्या महिन्यात तो मजबूत होण्याची चिन्हे आहेत. आजवर उद्भवलेल्या एल निनोमुळे भारतातील मान्सूनवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. एल निनोमुळे मान्सूनच्या सरसरीत घट होऊन अवर्षणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

          शास्त्रज्ञांच्या मते एल निनोच्या निर्मितीचा ठराविक काळ सांगता येणे शक्य नाही. मात्र दर २ ते ७ वर्षांनी तो निर्माण होतो. त्याचा परिणाम महासागरांच्या जवळ असणाऱ्या देशांच्या पर्जन्यवृष्टीवर पडतो. २००९ हे एल निनोचे वर्ष होते. त्यावर्षी भारतात तब्बल २२ टक्के कमी पाऊस पडला. ज्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. त्यापूर्वीही एल निनोच्या प्रभावामुळे १९७२ साली २४ टक्के, १९८७ साली १३ टक्के, २००२ साली १९.२ टक्के कमी पाऊस पडल्याचे दिसून येते. राज्यातील ८० टक्के शेतीचे भवितव्य हे जून ते ऑक्टोबर दरम्यान पडणार्या पावसावर अवलंबून असते. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे या काळातील पावसाची सरासरी केवळ ९३ टक्केच राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्याने वर्तवला आहे. तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भाताच्या रोपवाटिका २ किंवा ३ टप्प्यात लावाव्यात, किंवा वेळ पडल्यास भाताची रोपे दापोग पद्धतीने तयार करावीत. काही भागात दुबार पेरणीची गरज पडल्यास अधिक बियाणाची तरतूद करावी अशा सूचना देण्यात आल्या अहेत. एल निनोमुळे भूगर्भीय जलाची पातळी खालावण्याची शक्यता अहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई जाणवू शकते. तर वैश्विक उष्मावृद्धीमुळे  हिमनग वितळू लागल्यास समुद्राची पातळी वाढून किनारपट्टयाही धोक्यात येऊ शकतात. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे तर स्कायमेट या खाजगी हवामानशास्त्र कंपनीने मात्र एल निनोच्या घडामोडी या सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या नैऋत्य मान्सूनवर होणार नसल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे यावर्षी १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटचे उपाध्यक्ष जी पी शर्मा यांनी व्यक्त केली आहे.