शनिवार, ३१ मार्च, २०१८

माझा वाढदिवस

मला अनेकदा अनेकांनी विचारलं असेल, तुझा वाढदिवस कधी? मात्र आजही मी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते. यामागचं कारण काय हे मला आजही सांगता येणार नाही.
बरीच वर्ष उलटून गेली आहेत आत्ता. मात्र शाळा आणि तिथले दिवस मात्र विसरता येत नाहीत. प्राथमिक शाळेत असताना ज्यांचा वाढदिवस असे त्या मुलांना बाई समोर बोलावत. अन्य मुलं त्यांना शुभेच्छा देणारा श्लोक म्हणत. त्यानंतर वाढदिवस असणारी मुले वर्गातल्या सगळ्या मुलांना भेटवस्तू देत असत. त्या भेटवस्तूंची उत्सुकता इतकी असे की बाईंच्या लक्षात नसलं तरी वर्गातली अन्य मुले त्यांना आठवण करून देत. कुणी पेन्सिल, कुणी कंपास, तर कुणी अन्य नव्या नव्या वस्तू देई. कुणीतरी आपल्याला काही दिलं तर आपणही द्यायला हवं ही समज तेव्हाही होतीच. पण ऐपत नव्हती. मग वाटायचं, आपला वाढदिवस कधीच येऊ नये. तो कुणाच्या लक्षात असू नये. किमान आपल्या वाढदिवसाला सार्वजनिक सुट्टीच असावी. माझा वाढदिवस मार्चअखेरीस असल्याने हे घडायचंही अनेकदा. पुढे माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात आल्यावर मैत्रिणींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहत आले. कुठेतरी हॉटेलमध्ये जायचं, मैत्रिणींना खाऊ घालायचं, महागडी गिफ्ट द्यायची म्हणजे वाढदिवस हे समीकरण कळू लागलं आणि मग वाढदिवस हा शब्द ऐकला की मी काढता पाय घेऊ लागले. आणि तसंही कुणी माझा वाढदिवस लक्षातही ठेवला नाही. तेव्हापासून आजपर्यंत वाढदिवस या शब्दाची गूढ भीती कायम आहे.
गतवर्षी मी ठरवलं होतं, आपल्या वाढदिवसाला सुट्टीच घ्यायची. मात्र नेमका त्याचदिवशी टीवायबीएच्या मुलांनी त्यांचा निरोप समारंभ ठेवला. मला कुणी अचानक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर? या विचाराने हादरलेच होते मी. मनात प्रचंड चलबिचल होती. मुलं वर्गाची सजावट करत होती. मी तयारी कुठवर आलीये हे पहायला गेले तर त्यांनी मला हाताला धरून बाहेरच काढलं आणि दार लावून घेतलं. नंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा सुखद धक्काच बसला. फळ्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा, फुगे, केक आणि मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद. मनात खोलवर जाणवलं, हा माझा खरा वाढदिवस. केक कापल्यावर मुलांनी फुगा फोडला आणि त्यातून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला. मी प्रत्येक चिठ्ठी वाचली. मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपण खूपच स्पेशल आहोत हे तेव्हा जाणवलं. आपलं जगात येणं सार्थकी लागलंय असं वाटलं.
यावर्षी अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक सुट्टी होती. मात्र तरीही रात्री १२ वाजता मुलांनी पाठवलेले शुभेच्छासंदेश यायला  सुरुवात झाली आणि हा ओघ संध्याकाळपर्यंत सुरु होता. प्रत्येकाचे संदेश लगेच वाचणं शक्य नव्हतं. मात्र आपल्या शुभेच्छा बाईंनी वाचल्या नाहीत या विचाराने अस्वस्थ झालेल्या काहींनी मग फोनवरून शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरा जेव्हा मोबाईल हातात घेतला तेव्हा पाहिलं तर सोशल मिडीयावर तर शुभेच्छा होत्याच. मात्र मुलांनी त्याच्या वैयक्तिक प्रोफाईल फोटो, स्टेटस यातूनही माझा वाढदिवस साजरा केला होता. रात्री खूप उशिरा एका मैत्रिणीने विचारलं, आज काय काय गिफ्ट्स मिळाली. मी म्हटलं, मुलांच्या मनातलं आदराचं स्थान, त्याचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि त्यांच्या शुभेच्छा ! पुष्कळ झालं. अजून काय हवं.
मुलांनो, तुमचे आभार कसे मानायचे? मला खरंच सुचत नाही. पण तुमचा हा लोभ असाच राहो हेच ईश्वराकडे मागणे. खूप मोठ्ठे व्हा !


रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

टू वीक्स - एक भावनिक थरार



भारतीय इडीयट बॉक्सवरच्या मालिकांमधला तोच तो मेलोड्रामा, तीच ती कथानकं आणि ओढून ताणून वाढवलेले भाग पाहून विटून गेले. चित्रपट पहावे म्हटलं तर त्यातही काही नाविन्य नाही. (काही अपवाद असतात हेही मान्य आहे.) रियालिटी शोमध्ये काहीच रिअल नाही आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये चाललेल्या धांगडधिंग्याला विनोद म्हणवत नाही. अशा स्थितीत मी वळले जरा पूर्वेकडे. (पाश्चात्यांचं आकर्षण तसं कमीच आहे मला.) मग दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स, जपान, चीन इथले कार्यक्रम पाहणं सुरु झालं आणि मग विरंगुळ्याचा एक वेगळाच मार्ग सापडला. यात सर्वाधिक भावलेल्या काही मालिकांबद्दल लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
टू वीक्स ही अशीच एक मालिका. अवघ्या २० भागात १४ दिवसांतील घटनाक्रम वेगाने उलगडत जातो. हा वेग इतका आहे की आपल्याला झपाटून टाकतो. (२० तासांची ही मालिका मी २ दिवसांत पाहून संपवली.) मालिकेची सुरुवात आयुष्याचा अर्थ हरवून बसलेल्या जांग ताय सनच्या बेफिकीर वागण्याने होते. कुणासाठी आणि का जगायचं हे अनुत्तरीत प्रश्न घेऊन ताय सन दिवस कंठतोय, अविचाराने वागतोय, मृत्यू केव्हाही समोर आला तरी मी मरायला तयार आहे असे सांगत एका पॉन शॉपमध्ये काम करतोय. अचानक ८ वर्षांपूर्वीची त्याची प्रेयसी इन हे त्याला भेटते. गर्भपात करण्यासाठी इन हेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आपण पळ काढला होता हे ताय सनला आठवतं. काही क्षण तो विचलित होतो. इन हे  तिच्या ल्युकेमिया झालेल्या ८ वर्षाच्या मुलीसाठी बोनमॅरो मागण्यासाठी ताय सनकडे आलेली असते. जगात एकट्या पडलेल्या ताय सनची भेट त्याच्या मुलीशी सू जीनशी होते. जीवनात आता एक आशेचा किरण उगवतोय असं वाटत असतानाच इन हे ताय सनला ती संग वू नावाच्या तरुणाशी विवाह करणार असल्याचे सांगते. सू जीनच्या मते तिचे वडील जगात नाहीत, ती संग वूला पिता म्हणून स्वीकारायला तयार आहे हे ऐकून ताय सन पुन्हा एकदा मनातून निराश होतो. सू जीनची सर्जरी २ आठवड्यांनी होणार असते. फक्त २ आठवडे आपल्याला स्वताला जपायला हवं. त्यानंतर कोणत्याही क्षणी आपण मृत्यूला कवटाळू असा निश्चय करून ताय सन हॉस्पिटलमधून बाहेर पडतो.
मात्र त्याचदिवशी काही भ्रष्ट मंत्र्यांकरवी एका खुनाच्या खटल्यात ताय सनला नाहक अडकवलं जातं. त्याला ठार मारण्याचे प्रयत्न होतात. सू जीनसाठी २ आठवडे जगलं पाहिजे या एका जिद्दीने ताय सन कोठडीतून पळून जातो. त्याचा शोध सुरु होतो. पोलीस अधिकारी असणारा संग वू सू जीनच्या सर्जरीसाठी रजेवर गेलेला असतो. मात्र त्याला रजा रद्द करून ताय सनच्या शोधाची जबाबदारी सोपवली जाते. तर जे क्योंग नावाची तरुण प्रोसिक्युटर मात्र ताय सन निर्दोष आहे हे सिद्ध करण्यातही धडपडत असते. ८ वर्षांपूर्वी जे क्योंगच्या वडिलांची हत्या केल्याच्या खोट्या आरोपाखाली ताय सनने शिक्षा भोगलेली असते. मात्र खऱ्या गुन्हेगारांना शासन व्हावं आणि पुन्हा एकदा ताय सनला न केलेल्या गुन्ह्याची सजा मिळू नये यासाठी जे क्योंगचे प्रयत्न सुरु असतात. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ताय सनचा संघर्ष सुरु होतो. सु जीनला बोनमॅरो देणारी व्यक्ती ताय सन आहे हे माहित नसलेला संग वू ही केस लवकरच संपवण्याचा निश्चय करतो आणि त्याच नादात ताय सनवर गोळ्या झाडतो. जखमी झालेला ताय सन दरीत कोसळतो. आणि पुढे काय होतं ते आपण प्रत्यक्षच पाहिलं पाहिजे.
एका अस्तित्त्व हरवलेल्या पित्याचा आपल्या मुलीला नवे जीवन देण्यासाठीचा, एका होणाऱ्या पित्याचा आपल्या भावी मुलीच्या सर्जरीसाठी तिच्या जवळ राहण्यासाठीचा आणि एका मुलीचा आपल्या दिवंगत पित्याला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा संघर्ष आहे. तर आजारी मुलगी, भलत्याच संकटात अडकलेल्या पूर्वायुष्यातील प्रियकर आणि त्याचा मागमूस धुंडाळणारा भावी पती यांच्यात इन हेची होणारी घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. घट्ट बांधलेलं कथानक, अचूक दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय आणि पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत जाणवणारा ताण आपल्याला खिळवून ठेवतो. दक्षिण कोरियाच नव्हे तर हॉलीवूडमध्येही अॅक्शन हिरो म्हणून नाव कमावलेल्या ली जुंग गीला (रेसिडेंट एविलमधला कमांडर चू आठवतोय का? हाच आहे तो.) हळवा बाप म्हणून पाहणं एक वेगळाच अनुभव आहे. आयरिस या मालिकेत अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स देणाऱ्या किम सो योनने प्रोसिक्युटर म्हणून गुन्हेगारांचा माग काढताना दिलेले अॅक्शन सीन्स बेस्टच. (आपल्या मालिकांमध्ये अॅक्शन सीन्स म्हणजे ?????) याखेरीज रु सू योंग याने रंगवलेला संग वू, सू जीनसाठी त्याची सततची घालमेल, ताय सन आपल्या भावी पत्नीच्या मुलीचा पिता आहे हे कळल्यानंतरही त्याने ताय सनला वाचविण्यासाठी केलेली खटपट, कर्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ घालताना त्याचा उडणारा गोंधळ आपल्याला त्याच्या जागी नेऊन उभा करतो. या सगळ्या घटनाक्रमांचा ताण मनावर असूनही सू जीनच्या समोर हसतमुखाने जाणारी, रोज रात्री गोष्टी सांगणारी ममताळू आई पार्क हा सूनने छान रेखाटली आहे. यांच्याखेरीज संपूर्ण मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा सर्व कलाकारांनी छान निभावल्या आहेत.
मला तरी ही मालिका खूप आवडली. मालिका कोरियन भाषेत असली तरी इंग्रजी सबटायटलच्या आधारे तुम्ही नक्कीच ही मालिका पाहू शकता. तुम्हालाही ही मालिका नक्की आवडेल अशी खात्री आहे.



मंगळवार, ३१ मे, २०१६

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले




पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!
सुरेश भट

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

दंगा




तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट

रिक्त




उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


सुरेश भट

उशीर



हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!

केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!

आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!

होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!

झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


सुरेश भट